वृत्तसंस्था, मुंबई

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी निवड झाल्यापासून हार्दिक पंडय़ाला बऱ्याच टीकेला, शेरेबाजीला सामोरे जावे लागत आहे. अहमदाबाद, हैदराबादपाठोपाठ मुंबईत घरच्या प्रेक्षकांनीही हार्दिकला लक्ष्य केले. त्यातच मुंबईचा संघ सुरुवातीच्या तीनही ‘आयपीएल’ सामन्यांत पराभूत झाल्याने हार्दिकवर दडपण वाढत चालले आहे. त्यामुळे हार्दिकऐवजी पुन्हा रोहितकडे कर्णधारपद सोपवले जाऊ शकेल, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत माजी क्रिकेटपटूंमध्येही मतमतांतरे आहेत.

‘‘हार्दिकचे कर्णधारपद नक्कीच धोक्यात येऊ शकेल. फ्रेंचायझी क्रिकेटची मला जितकी समज आहे, त्यानुसार संघमालक मोठे निर्णय घ्यायला घाबरत नाहीत. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी रोहितकडून कर्णधापद काढून घेत ते हार्दिककडे देण्याचे धाडस दाखवले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच ‘आयपीएल’ जेतेपदे मिळवली होती. आता हार्दिक कर्णधार झाल्यापासून मुंबईने एकही सामना जिंकलेला नाही. त्यातच त्याच्याकडून बऱ्याच चुकाही होत आहेत. त्यामुळे कर्णधारपद पुन्हा रोहितकडे गेल्यास आश्चर्य वाटणार नाही,’’ असे भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी म्हणाला.

हेही वाचा >>>IPL 2024: शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये अजून एक मोठा रेकॉर्ड; रोहित, विराट, रहाणे सर्वांनाच टाकलं मागे

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग मात्र तिवारीशी सहमत नव्हता. ‘‘रोहितच्या नेतृत्वाखालीही मुंबईने यापूर्वी हंगामाची सुरुवात सलग पाच पराभवांनी केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन हार्दिकला कर्णधारपदावरून काढण्याची घाई करणार नाही,’’ असे सेहवाग म्हणाला.

‘‘हार्दिकला पुरेसा वेळ दिला जाईल. मात्र, त्यानंतरही कामगिरीत सुधारणा न झाल्यास मुंबईच्या व्यवस्थापनाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. यापूर्वी असे दोन-तीन फ्रेंचायझींच्या बाबतीत झाले आहे. चेन्नईने जडेजाला कर्णधारपद सोपविले होते. मात्र, त्याला अपयश आल्यानंतर हंगामाच्या मध्यातच धोनीने पुन्हा कर्णधारपद सांभाळले. तुम्ही केवळ तीन सामन्यांनंतर कर्णधार बदलू शकत नाही. सात सामन्यांनंतर कामगिरीच्या आधारे तुम्ही निर्णय घेऊ शकता,’’ असेही सेहवागने सांगितले.

हेही वाचा >>>IPL 2024: पंजाब कब जिता है? शशांक सिंहच्या वादळी खेळीच्या जोरावर पंजाबची गुजरातवर मात

मुंबईला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने विक्रमी धावसंख्या उभारत मुंबईवर मात केली. तिसऱ्या सामन्यात घरच्या मैदानावर मुंबईची फलंदाजी ढेपाळली आणि राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत केले. त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मायकल क्लार्ककडून पाठराखण

भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यापूर्वीच हार्दिकला पािठबा दर्शवला होता. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही हार्दिकची पाठराखण केली आहे. ‘‘मुंबईचे चाहते आपल्याच संघाच्या कर्णधाराविरुद्ध शेरेबाजी करत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते. हार्दिकने यापूर्वी मुंबईच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याला अशी वागणूक मिळायला नको. मी भारतात दाखल झाल्यानंतर हार्दिकशी चर्चा केली होती. तो चांगल्या मन:स्थितीत आहे. शेरेबाजीचा त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही. परंतु कर्णधार म्हणून हार्दिकने आता मुंबईला विजयपथावर आणणे आवश्यक आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.