२०२० वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध इंदूरच्या मैदानावर दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.

२०१९ वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कोण काढतं यासाठी रोहित आणि विराटमध्ये शर्यत लागली होती. मात्र २०१९ वर्षातला अखेरचा टी-२० सामना खेळल्यानंतर दोघांमधली ही शर्यत बरोबरीत सुटली होती. दोन्ही फलंदाज २०१९ वर्षाच्या अखेरीस २६३३ धावांनिशी संयुक्तपणे अव्वल स्थानी होते.

मात्र रोहित शर्माने लंकेविरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती घेतली असल्यामुळे विराटकडे रोहितला मागे टाकण्याची चांगली संधी होती. पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर, दुसऱ्या टी-२० सामन्यात लंकेने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शिखर-लोकेश राहुल जोडी माघारी परतल्यानंतर विराटने एक धाव काढत रोहितला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं.