आयर्लंडवर २ टी-२० सामन्यांमध्ये मात केल्यानंतर भारताने आपल्या इंग्लंड दौऱ्याची सुरुवातही मोठ्या धडाक्यात केली आहे. पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारताने इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. या विजयासह भारत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. कुलदीप यादव आणि लोकेश राहुल हे भारताच्या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरले आहेत. कुलदीपने गोलंदाजीत ५ बळी घेतले, तर लोकेश राहुलने १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद १०१ धावांची शतकी खेळीही केली. दरम्यान या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी ८ विक्रमांचीही नोंद केली.

१ – टी-२० क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारा कुलदीप यादव हा पहिला डावखुरा मनगटी फिरकीपटू ठरला आहे.

१ – टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावा करण्याचा विक्रमही कोहलीने आपल्या नावावर केला आहे. कोहलीने ५६ डावांमध्ये ही किमया साधली आहे.

४ – टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा करणारा विराट कोहली चौथा फलंदाज ठरला आहे.

२ – लोकेश राहुलचं टी-२० क्रिकेटमधलं हे दुसरं शतक ठरलं. राहुलने पहिलं शतक झिम्बाब्वेविरुद्ध झळकावलं होतं.

३ – टी-२० क्रिकेटमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त बळी घेणारा कुलदीप यादव तिसरा गोलंदाज ठरला आहे. भारताचे उरलेले दोन गोलंदाज पुढीलप्रमाणे…

  • युझवेंद्र चहल ६/२५, विरुद्ध इंग्लंड, बंगळुरु (२०१७), भुवनेश्वर कुमार ५/२४, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग (२०१८)

१ – टी-२० क्रिकेटमध्ये एका सामन्यात लागोपाठ दोन चेंडूवर यष्टीचीत करणारा कुलदीप यादव पहिला गोलंदाज ठरला आहे.

३३ – महेंद्रसिंह धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या ३३ व्या यष्टीचीत फलंदाजाची नोंद केली. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त यष्टीचीत बळी घेण्याचा मान आता धोनीच्या नावावर. धोनीने पाकिस्तानच्या कामरान अकमल (३२) चा विक्रम मोडला.