Virat Kohli’s special post for RCB fans : आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला. त्याना राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात ४ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर दोन दिवसांनी विराट कोहलीने आपल्या चाहत्यांचे आभार मानन्यासाठी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. यासह विराट कोहलीने आरसीबी संघाचाचा एक फोटो शेअर केला आहे.

आरसीबीचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने इन्स्टावर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. विराटने लिहिले, ‘आमच्यावर नेहमीप्रमाणे प्रेम आणि कौतुक केल्याबद्दल सर्व आरसीबी चाहत्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.’

आयपीएल २०२४च्या पहिल्या टप्प्यातच जवळपास बाहेर पडलेल्या आरसीबी संघाने दुसऱ्या टप्प्यात दमदार पुनरागमन केले. आरसीबीने सलग सहा सामन्यात विजय मिळवत अशक्यप्राय वाटणारी प्लेऑफ्सची फेरी गाठली. ज्यामध्ये त्याने सीएसकेलाही पराभवाची धूळ चारली. मात्र एलिमिनेटरमध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबीला पराभूत व्हावे लागले. ज्यामुळे१७ वर्षापासून ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले.

हेही वाचा – T20 WC 2024 : दिनेश कार्तिक IPL निवृत्तीनंतर दिसणार नव्या भूमिकेत, टी-२० विश्वचषकासाठी मिळाली मोठी जबाबदारी

विराट कोहलीची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –

विराट कोहली आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या हंगामात त्याने १५ सामने खेळले आहेत. या काळात त्याने १५ डावात ६१.७५ च्या सरासरीने आणि १५४.६९ च्या स्ट्राईक रेटने ७४१ धावा केल्या आहेत. १७ व्या हंगामात विराटने ५ अर्धशतकांसह १ शतक झळकावले आहे. या हंगामात नाबाद ११३ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. आरसीबीच्या सामन्यादरम्यान विराट कोहलीला चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. बंगळुरू येथील सामन्यांदरम्यान, स्टेडियम लाल जर्सींनी उजळून गेलेली दिसले.

हेही वाचा – T20 WC 2024 : टी-२० विश्वचषकापूर्वी हार्दिक स्वत:ला करतोय ‘रिचार्ज’, स्विमिंग पूलमधील VIDEO केला शेअर

आरसीबीने केले होते जोरदार पुनरागमन –

आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, संघाने १४ पैकी ७ सामने जिंकले. ७ सामन्यात संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. १४ गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाने पहिल्या ८ पैकी फक्त १ सामना जिंकला. यानंतर आरसीबीने जादुई पुनरागमन केले. एकेकाळी प्लेऑफच्या शर्यतीपासून दूर असलेल्या बंगळुरूने अखेरच्या प्लेऑफ्सच्या अंतिम ४ संघांत स्थान मिळवले. संघाने ग्रुप स्टेजमधील शेवटच्या ६ पैकी ६ सामने जिंकले.