कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चांगली सुरुवात केलेल्या दिल्लीच्या संघाला उत्तरार्धात फटके बसले. अनुभवी खेळाडूंचं फॉर्मात नसणं संघाला चांगलंच भोवलं. परंतू यावर मात करुन दिल्लीने प्ले-ऑफचं तिकीट मिळवलं. परंतु पहिल्याच क्वालिफायर सामन्यात मुंबईने ५७ धावांनी विजय मिळवत दिल्लीला आणखी एक धक्का दिला.

परंतू यामुळे खचून न जाता दिल्लीने हैदराबादविरुद्ध सामन्यात धडाकेबाज खेळी करत आपलं अंतिम फेरीतलं तिकीट बुक केलं. आयपीएलच्या इतिहासात अंतिम फेरी गाठण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ ठरली आहे. जाणून घेऊयात त्यांची आतापर्यंतची कामगिरी…

  • २००८ – उपांत्य फेरी
  • २००९ – उपांत्य फेरी
  • २०१० – पाचवे स्थान
  • २०११ – दहावे स्थान
  • २०१२ – उपांत्य फेरी
  • २०१३ – नववे स्थान
  • २०१४ – आठवे स्थान
  • २०१५ – सातवे स्थान
  • २०१६ – सहावे स्थान
  • २०१७ – सहावे स्थान
  • २०१८ – आठवे स्थान
  • २०१९ – सातवे स्थान

त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ यंदा कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दिल्लीकडून शिखर धवनने आतापर्यंत फलंदाजीत आपली चमक दाखवली आहे. तर गोलंदाजीत कगिसो रबाडाने सर्वाधिक बळी घेत पर्पल कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थान आपल्याकडे राखलं आहे. परंतू दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सचा संघही चांगल्याच फॉर्मात आहे. डी-कॉक, इशान किशन, सूर्यकुमार, पोलार्ड, पांड्या तर गोलंदाजी बुमराह-बोल्ट यांची जोडी प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या अंतिम फेरीत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.