रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपल्या शानदार आणि अनपेक्षित कामगिरीसह थेट आयपीएलच्या प्लेऑफमध्ये जागा मिळवली. गणितीय समीकरणांच्या आधारे बलाढ्य चेन्नईचा पराभव करत आरसीबीने दमदार कामगिरी केली. आता आरसीबी राजस्थान रॉयल्सविरूद्ध एलिमिनेटर सामना खेळणार आहे. पण याच दरम्यान संघाच्या माजी खेळाडूने सर्वांसमोर आरसीबीच्या चाहत्यांची माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१६ च्या आयपीएल हंगामात दमदार कामगिरी केली होती. इतकंच नव्हे तर संघाने अंतिम फेरीही गाठली. आरसीबी विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. यानंतरही हैदराबादने हा सामना ८ धावांनी जिंकला. त्या फायनलमध्ये आरसीबीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते शेन वॉटसन. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात २४ धावा आणि ४ षटकांच्या स्पेलमध्ये ६१ धावा दिल्या होत्या. फलंदाजीत त्याने ९ चेंडूत अवघ्या ११ धावाच केल्या होत्या.

हेही वाचा – IPL 2024: हरभजनने ‘या’ खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या सुमार कामगिरीचं खापर; म्हणाला, “हार्दिकची काही चूक नाही…”

शेन वॉटसनची गणना टी-२० मधील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्या फायनलमधील निराशाजनक कामगिरीसाठी आता त्याने आरसीबी चाहत्यांची माफी मागितली आहे. वॉटसन एका कार्यक्रमात म्हणाला, ‘मी इथे उपस्थित असलेल्या सर्व आरसीबी चाहत्यांची मनापासून माफी मागतो. मला RCB चाहत्यांची माफी मागावी लागेल कारण २०१६ च्या आयपीएल फायनल चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. मी शक्य तितकी चांगली तयारी केली होती. मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेन अशी आशा होती, पण अंतिम फेरीत माझी कामगिरी सर्वात वाईट ठरली मुख्यत्वे गोलंदाजी करताना. कदाचित माझ्यामुळे आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकू शकली नाही.

शेन वॉटसन आरसीबीसाठी फायनलमध्ये फ्लॉप झाला असला तरी त्याने दोन संघांना चॅम्पियन बनवले आहे. २००८ मध्ये वॉटसन राजस्थान रॉयल्सचा भाग होता. त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. याशिवाय २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला चॅम्पियन बनवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. चेन्नईसाठी त्याने हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते.

२०१६ पासून आरसीबी अद्याप आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही. दरम्यान, फॅफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने अप्रतिम कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. सलग ६ सामने जिंकणाऱ्या या संघाचा एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सशी सामना होणार आहे. आरसीबीला चॅम्पियन बनायचे असेल तर त्यांना सलग तीन सामने जिंकावे लागतील.

आऱसीबीला सलग तीन सामने जिंकायचे आहेत म्हणजेच राजस्थानविरूद्धचा एलिमिनेटर सामना, त्यानंतर दुसरा क्वालिफायर सामना जिंकून अंतिम सामना गाठेल. तर अंतिम सामन्यातही संघाने विजय मिळवल्यास ट्रॉफीचा दुष्काळ नक्कीच संपवतील.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane watson apologizes rcb fans for ipl 2016 final defeat and his poor performance video viral