ओडीशात सुरु असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचं भारतीय संघाचं स्वप्न अपूर्णच राहिलं. उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँडने भारतावर २-१ अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत नेदरलँडची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताची कामगिरी खराब राहिलेली आहे. मात्र घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाकडून यंदा चांगल्या कामगिरीच्या आशा होता, मात्र भारतीय संघाला अशी कामगिरी करण्यात अपयश आलं.

पहिल्या सत्राची सुरुवात भारताने आक्रमक केली. नेदरलँडचा बचाव भेदत भारतीय खेळाडूंनी पेनल्टी एरियात प्रवेश केला. प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी आक्रमक खेळ करण्याचा दिलेला सल्ला भारतीय खेळाडूंनी तंतोतंत पाळला. पहिल्या मिनीटापासून घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे नेदरलँडचे खेळाडू थोडे भांबवाले. १२ व्या मिनीटाला भारताला पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी आली, आकाशदीप सिंहने याचा पुरेपूर फायदा उचलत यजमान संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र नेदरलँडनेही वेळेतच स्वतःला सावरत पहिल्या सत्राच्या अखेरीस मैदानी गोल करुन सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. थिएरी ब्रिंकमॅनने नेदरलँडला सामन्यात बरोबरी साधून दिली.

दुसऱ्या सत्रामध्ये दोन्ही संघानी काहीसा सावध पवित्रा घेत एकमेकांची ताकद आजमवण्याकडे कल दिला. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या काही खेळाडूंनी या सत्रात सुंदर चाली रचल्या, मात्र गोल करण्यात त्यांना अपयश आलं. दुसऱ्या सत्रात नेदरलँडने आपल्या बचावाकडे अधिक लक्ष दिलं. या कारणामुळे दुसऱ्या सत्रात कोणत्याही संघाला गोल करण्यात अपयश आल्यामुळे मध्यांतरापर्यंत सामना १-१ बरोबरीत होता. तिसऱ्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला.नेदरलँडला सलग ३ पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी आली होती, मात्र भारतीय बचावफळीने हा प्रयत्न हाणून पाडला. आघाडीच्या फळीतील सिमरनजीत सिंह, आकाशदीप यांनीही तिसऱ्या सत्रात नेदरलँडवर चांगला दबाव आणला. मात्र बॉलवर ताबा ठेवण्यात अपयश आल्याने भारतही गोल करता आला नाही.

तिसऱ्या सत्रापर्यंत सामन्यातली कोंडी न फुटल्यामुळे अखेरचं सत्र रंगतदार झालं. सिमरनजीतने सुरुवातीलाच नेदरलँडचा बचाव भेदत आपले इरादे स्पष्ट केले. मात्र ५० व्या मिनीटाला नेदरलँडच्या खेळाडूला चुकीच्या पद्धतीने रोखल्यामुळे नेदरलँडला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्यात आला. वॅन डर व्रिडनने या संधीचा पुरेपूर फायदा उचलत आपल्या संघाला सामन्यात आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनीटात दबावाखाली आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी क्षुल्लक चुका करण्यास सुरुवात केली. अमित रोहिदासला पंचांनी पिवळं कार्ड दाखवबून मैदानाबाहेर बसवलं. पेनल्टी कॉर्नरवरचं अपयश भारताला या सामन्यातही चांगलंच भोवलं. शेवटच्या ५ मिनीटात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करणं भारताला जमलं नाही. गोलकिपर पिरमीन ब्लाकने नेदरलँडच्या गोलपोस्टचा भक्कम बचाव केला. अखेरच्या मिनीटापर्यंत भारताने सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र भक्कम बचाव करत नेदरलँडने आपल्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.