जुलै महिन्याच्या अखेरीस भारताचा आणि मुंबईचा अव्वल कुस्तीपटू नरसिंग याच्यावर लावण्यात आलेली चार वर्षांच्या बंदीची शिक्षा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे नरसिंगला पुनरागमन करण्याची तसेच ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसर जुलै-ऑगस्ट महिन्यात झाली असती तर नरसिंगची ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी हुकली असती. पण आता करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षांने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ७४ किलो वजनी गटात भारताला ऑलिम्पिकचे एक स्थान मिळवून देण्याची संधी नरसिंगला मिळू शकते.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेआधी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे क्रीडा लवादाने नरसिंगवर ऑगस्ट २०१६मध्ये चार वर्षांची बंदी लादली होती. ‘‘नरसिंगने आमच्याकडे येऊन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याला रोखू शकणार नाही. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो पुनरागमन करू शकतो,’’ असे भारतीय कुस्ती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.

३१ वर्षीय यादवने २०१५मध्ये लास वेगास येथील जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवत रिओ ऑलिम्पिकसाठी एक जागा निश्चित केली होती. पण नामांकित कुस्तीपटू सुशील कुमारशी  खडाजंगी झाल्यानंतर अचानकपणे नरसिंग उत्तेजक चाचणीत दोषी सापडला होता.