सलग ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर अखेर, प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात तेलगू टायटन्सच्या पराभवाची मालिका खंडीत झालेली आहे. बंगळुरु बुल्स विरुद्धच्या सामन्यात तेलगू टायटन्सने २१-२१ अशी बरोबरी साधत सामन्यात पुनरागमन केलं. गेल्या ५ सामन्यांप्रमाणे या सामन्यातही तेलगू टायटन्सच्या संघाचा खेळ आपल्या लौकिकाला साजेसा झाला नाही. मात्र अखेरच्या सत्रात कर्णधार राहुल चौधरीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत संघाला बरोबरी मिळवून दिली.

बंगळुरु बुल्सकडून आजच्या सामन्यात कर्णधार रोहीत कुमारने चांगल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं. रेडींगमध्ये त्याने ५ पॉईंटची कमाई करत सुरुवातीच्या सत्रात आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. तेलगू टायटन्स वारंवार सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र बचावपटूंच्या एकत्रित कामगिरीच्या जोरावर बंगळुरु बुल्सच्या संघाने सामन्यात ३-४ गुणांची आघाडी घेतली होती.

मात्र सामन्याच्या दुसऱ्या सत्रात तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने मॅरेथॉन रेड्स करत सामन्यात पुनरागमन केलं. त्याला निलेश साळुंखेनेही ४ पॉईंट मिळवत चांगली साथ दिली. अखेरच्या काही सेकंदांमध्ये बंगळुरुकडे केवळ एका गुणाची आघाडी असताना, राहुल चौधरीने अखरेच्या रेडमध्ये प्रितम छिल्लरला बाद करत सामना बरोबरीत सोडवला.

पाच सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्सला सामना बरोबरीत सोडवण्यात यश आलं आहे. त्यामुळे आगामी सामन्यात आता तेलगू टायटन्सचा संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi Season 5 – हरियाणा स्टिलर्सच्या मेहनतीला फळ, गुजरातच्या पदरी पराभव