करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका भारतात क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामासह सर्व महत्वाच्या स्थानिक स्पर्धा स्थगित केल्या आहेत. क्रिकेटची रखडलेली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न बीसीसीआय करत असलं तरीही येत्या काही महिन्यांमध्ये क्रिकेटचे सामने सुरु होण्याची शक्यता कमी दिसत आहे. अशा परिस्थितीत भारताचा माजी सलामीवीर आणि मुंबईकर वासिम जाफरने यंदाच्या हंगामातील विजय हजारे, दुलिप आणि देवधर करंडक स्पर्धा रद्द करुन फक्त रणजी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेचं आयोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

बीसीसीआयचा २०२०-२१ चा स्थानिक क्रिकेटचा हंगाम हा ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणं अपेक्षित आहे. परंतु करोनामुळे बीसीसीआयने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाहीये. “जेव्हा कधीही क्रिकेट सुरु करण्याची परिस्थिती तयार होईल त्यावेळी आयपीएल हे बीसीसीआयचं पहिलं प्राधान्य असणार आहे. आयपीएल संपल्यानंतर बीसीसीआय इराणी ट्रॉफीचं आयोजन करु शकते. कारण सौराष्ट्राने यंदा रणजी करंडक जिंकल्यामुळे त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे. यानंतर रणजी करंडक आणि पुढील वर्षाच्या आयपीएल लिलावाआधी सय्यद मुश्ताक अली टी-२० चं आयोजन करायला हवं. विजय हजारे, दुलिप आणि देवधर करंडक स्पर्धा रद्द करुन तो वेळ इतर स्पर्धांच्या आयोजनासाठी राबवण्यात येऊ शकतो.” जाफर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यामागच्या आपल्या प्रस्तावामागचं जाफरने कारणही सांगितलं. “सर्व स्पर्धा खेळवण्याची घाई केली तर खेळाडूंना पुरेसा आराम मिळणार नाही. नवीन नियमांनुसार क्रिकेट खेळणं आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे माझ्या मते रद्द करण्यात आलेल्या स्पर्धांचा वेळ महत्वाच्या स्पर्धांसाठी वापरता येईल आण खेळाडूही त्याप्रमाणे नियोजन करु शकतात.” बीसीसीआय यंदाचा आयपीएल हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्याचा विचार करत आहे. परंतू, आयसीसी जोपर्यंत टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल विचार करत नाही तोपर्यंत बीसीसीआयला आयपीएलबद्दल निर्णय घेता येणार नाही.