दक्षिण अफ्रिकेसोबतच्या दोन कसोटी सामन्यात जेव्हा भारताला पराभव पत्करावा लागला तेव्हा विराट कोहलीवर टीका झाली होती. तसेच त्याची पत्नी अनुष्का शर्मालाही लोकांनी ट्रोल केले होते. मात्र साऊथ अफ्रिकेसोबतची एक दिवसीय सामन्यांची मालिका विराटसेनेने ५-१ ने जिंकली. ज्यानंतर विराटसेनेचे आणि विराट कोहलीचे कौतुक होते आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात विराटने शतक झळकवले. यानंतर आपल्या सगळ्या यशाचे श्रेय मी पत्नी अनुष्काला देतो असे विराटने म्हटले आहे. साऊथ अफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू शॉन पॉलॉकसोबत झालेल्या मुलाखतीत विराटने अनुष्काला यशाचे श्रेय दिले आहे.

अनुष्काने मला खूप प्रोत्साहन दिले. चांगला खेळ करण्यासाठी ती मला चांगले सल्ले देत राहिली. तिने माझ्यातली सकारत्मकता वाढवली म्हणून मी चांगला खेळू शकतो. माझ्या यशाचे श्रेय मी अनुष्काला देतो असे विराटने म्हटले आहे. अनेकदा माझा खेळ बिघडला की अनुष्कावर टीका होते किंवा तिला ट्रोल केले जाते. मात्र जेव्हा माझ्या समोर कठीण काळ असतो तेव्हा अनुष्का माझ्यासोबत असते. मला चांगला खेळ करण्यासाठी उद्युक्त करत असते.

जेव्हा तुम्ही संघाचे कप्तान असता तेव्हा तुमच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असते. अनेकदा तणाव असतो किंवा कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते. मात्र ज्यावेळी मला असे वाटते की मी चांगले खेळू शकलो नाही किंवा मी तणावात आहे तेव्हा अनुष्का माझ्या साथीला असते ती मला त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि माझी सकारात्मकता वाढवण्यासाठी प्रयत्न करते. त्याचमुळे माझ्या धडाकेबाज शतकाचे आणि माझ्या यशाचे सगळे श्रेय अनुष्काचे आहे असे विराटने म्हटले आहे.

शुक्रवारच्या सामन्यात टॉस जिंकूनही आणि गोलंदाजी करणे पसंत केले, कारण काल पिच स्लो होता तसेच फलंदाजी करणे कठीण जाणार होते. रात्री तो पिच फलंदाजीसाठी चांगला होता त्याचमुळे आम्ही चांगला खेळ करु शकलो असेही विराटने म्हटले आहे.

कर्णधार विराट कोहलीचं वन-डे क्रिकेटमधल्या ३५ व्या शतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर अखेरच्या वन-डे सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने ६ वन-डे सामन्यांची मालिका ५-१ च्या फरकाने जिंकली. आफ्रिकेने विजयासाठी दिलेले २०५ धावांचे आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. आपल्या या सगळ्या यशाचे श्रेय विराटने अनुष्काला दिले आहे.