परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी एका पार्टीत दोन बायका गप्पा मारत असतात. एक दुसरीला विचारते, ‘तुझा नवरा तुला सुखात ठेवतो का गं?’ जवळच असलेल्या नवरोबांचे कान तिकडेच असतात. उत्तर काय असणार याची खात्री असते त्याला. पण बायको म्हणते, ‘नाही’. तिचं हे धक्कादायक उत्तर ऐकून तो चक्रावतो. सगळीकडे सन्नाटा पसरतो. ती पुढे म्हणते, ‘ही डझन्ट मेक मी हॅपी, आय अॅम हॅपी. त्यानं मला सुखी करायची गरज नाही. ती जबाबदारी पूर्णपणे माझी आहे. माझी मीच सुखी आहे’. कुठे तरी वाचलेली ही गोष्ट. यशस्वी लग्नाचं गुपित सांगणारी. नक्की कुणासाठी आणि कशासाठी करतो आपण लग्न? हे असं कुणी तरी आपल्याला सुखात ठेवावं म्हणून? की एक रिवाज म्हणून? की समाजात मानानं जगता येण्यासाठी? कंटाळा आला म्हणून की वेळ जात नाही म्हणून? खरं तर लग्न करावं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लग्न ही गोष्ट इतकी समाजमान्य झाली आहे की तो प्रश्न अगदी सार्वजनिक बनून जातो. शिक्षण संपलं, नोकरी लागली. मग आता पुढे काय? तर लग्न! शामिकाच्या घरात सध्या याच कारणावरून वाद चालू आहे. ती दोन वर्षांपूर्वी आíकटेक्ट झाली. तिचं काम बघून तिला एका चांगल्या फर्ममध्ये नोकरीही मिळाली. आपल्या कामावर ती जाम खूश आहे. नवनवीन प्रोजेक्ट्स, चॅलेन्जेस, अचिव्हमेंट्स यात ती अगदी बुडून गेलीये. उरलेल्या वेळात मित्र-मत्रिणींबरोबर बाहेर जाणं, मोबाइलवर चॅटिंग यात ती बिझी असते. घरच्यांच्या वाटय़ाला ती फार कमी वेळ येते. आजकाल तर ती मुद्दामहूनच टाळते आपल्याला असं वाटायला लागलंय आई-बाबांना. नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी आई-बाबांना विचायायला सुरुवात केली यंदा कर्तव्य आहे का म्हणून. घरात आजीही असते. तिला कळतच नाहीये आता शामिका लग्न का करत नाहीये ते. झालं ना गं शिकून? मग आता काय? प्रत्येक गोष्टीची वेळ असते! त्यात मधेच कुणाच्या तरी लग्नाची पत्रिका येते. नाही तर शामिकाच्या एखाद्या मत्रिणीचं लग्न ठरल्याची बातमी येते. अशा वेळी ही चर्चा आणखीनच तीव्र होते. ‘मावशी तू एक दिवस येऊन बघ आमच्या घरी, तुलाही बोअर होईल. तुला माहितेय का, जेव्हा बघावं तेव्हा आमच्या घरी लग्नाचा विषय सुरू असतो. जणू काही जगात दुसरे कोणते विषयच नाहीत. खरं तर माझ्या डोक्यातही नाहीये असलं काही आत्ता. काय घाई आहे? बघू ना नंतर कधी तरी! तसं बघायला गेलं तर प्राणी कुठे करतात लग्न? आदिमानव काय लग्न करायचा? आणि लग्न झालं म्हणून लोक सुखी होतात का?, शामिकाकडे बिनतोड मुद्दे तयार आहेत वादासाठी. आई-बाबांनी शेवटी वैतागून विचारलं, ‘मग, काय म्हणणं आहे तुझं? लििव्हग-इन वगरेचा विचार करतेयस का? पण मुलं होणार असतील तर त्यासाठी तरी लग्न आवश्यक आहे हे पटतंय का तुला? त्या बिचाऱ्या मुलांना का तुमच्या विचारांची शिक्षा?’ ‘नॉट रियली. ही अशी कुणाला कमिटमेंट देणंच अवघड वाटतंय मला. कॅज्युअल डेटिंग वगरे ठीक आहे, पण इतकं माझं आयुष्य मला नाही शेअर करायचंय कुणाबरोबर आत्ता तरी. शिवाय लग्न केलं म्हणजे झालं असं कुठे असतं? लगेच लोक मुलाबिलांची चौकशी करायला सुरुवात करतात. आत्ता तुम्हीसुद्धा तेच केलंत. आपण लग्नाविषयी बोलत होतो तर तुम्ही मुलांवरच घसरलात. माझ्या काही मत्रिणींचं बघतेय ना मी. त्या अशाच घरच्यांच्या आग्रहाला बळी पडल्या. लग्न झाल्यावरही करता येतं करिअर असं त्या मला सांगायच्या. पण आता म्हणजे ‘करिअर वगैरे विसरा.. ’ अशी स्थिती झालीये त्यांची’. लग्नाच्या विषयाकडे आजचे तरुण वेगळ्या नजरेनं बघतायत. काय गरज आहे लग्नाची? सगळ्यांनी लग्न करायलाच हवं का? लग्न करणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे का? आणि स्वत:च्या आनंदासाठी, सुखासाठी म्हणून जर लग्न करायचं असेल तर त्यासाठी नवरा कशाला हवा? मी भरपूर कमावते, मला हवं ते करायला कुणाची बंदी नाही. हा.. कदाचित म्हातारपणी मला एकटं वाटेल. पण तेव्हाचं तेव्हा पाहू. मनात येईल ते करण्याचं स्वातंत्र्य गमावून कुणाचं तरी घर सांभाळण्याचं काम करण्यात काय अर्थ आहे, असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. आजकाल तर लग्न करण्यापूर्वीच प्री-नप्शिअल अॅग्रीमेंट करतात. उगाच पटलं बिटलं नाही तर नंतर काही भानगड नको. शामिकाला जी भीती वाटतेय त्यात कितपत तथ्य आहे? आणि ही भीती फक्त करिअरविषयीच आहे का? यातला कुठलाही नियम सर्वसाधारणपणे सगळ्यांनाच लागू करता येतो का? कमिटमेंट, स्वातंत्र्य, मुलं, जास्तीच्या जबाबदाऱ्या अशा अनेक गोष्टींचं तिला टेन्शन आहे, ते का? पूर्वी नव्हत्या का या गोष्टी? आजच्या जमान्याच्या टोकाच्या स्वकेंद्रित जगण्याचं हे प्रतििबब आहे का? की लग्न ही संस्थाच आता आउटडेटेड व्हायला लागलीय? मग कुटुंबसंस्थेचं भविष्य काय? आणि कुटुंबाच्या युनिटवर अवलंबून असलेल्या सोसायटीचं काय? या बदलत्या विचारप्रवाहात ती टिकून राहणार का? तुम्हाला काय वाटतं? viva@expressindia.com