आनंदी राहणे हे आजुबाजूच्या परिस्थितीबरोबरच आपल्या स्वत:वरही अवलंबून असते. आपण आतून खुश असू तर आपला मूड आपल्याही नकळत आनंदी राहतो. आनंदी असण्याचे मनावर ज्याप्रमाणे परिणाम होतात त्याचप्रमाणे शरीरावरही होतात. शरीरातून आनंदी हॉर्मोन स्त्रवल्याने अनेक आजारांपासून तुमची सुटका होते. आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या आयुष्याबाबत विचार न करणे आणि आपल्या भविष्याबाबतही जास्त विचार न करणे आवश्यक असते. त्यापेक्षा वर्तमानकाळाबाबत विचार करणे केव्हाही चांगले. पण अनेकांना विनाकारण लहानसहान गोष्टींचा विचार करण्याची वाईट सवय असते. जास्त विचार केल्याने हे लोक आनंदी राहू शकत नाहीत. काही गोष्टी या विचार करुन नाही तर परिस्थितीवर सोडून दिल्याने होतात. त्यामुळे जास्त विचार करत असाल तर ते पहिल्यांदा कमी करायला हवे हे लक्षात घ्या. १. दुसरे आपल्याबाबत काय विचार करतात दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करत राहीलात तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही. माझ्या वागण्याबाबत, कपड्यांबाबत, बोलण्या-दिसण्याबाबत आजुबाजूचे लोक काय विचार करतील असा विचार करुन आपण वापरत राहतो. त्यामुळे नकळत मनात एकप्रकारची भिती राहते. अशामुळे आपण आनंदी राहू शकत नाही. २. स्वत:चा विचार कमी करा अनेकज जण स्वत:चा इतका विचार करतात की आपला विचार करुन ते दु:खी होतात. अशावेळी आपण आनंदी राहू शकते हेच ते विसरुन जातात. पण तुम्हाला तुमचे रोजचे जगणे आनंदी करायचे असेल तर तुम्ही हे विचार नियंत्रणात ठेवायला हवे. जास्त विचार करुन कोणत्याही गोष्टीवर उत्तर मिळत नाही. ३. दुसरे काय करतात हा विचार करु नका आपले आयुष्य कायम आनंदी असेल असा विचार सगळेच करतात. पण असे अनेक लोक असतात जे स्वत:चे आयुष्य सोडून इतरांच्या आयुष्यात लक्ष घालून ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामुळे त्यांचे आणि समोरच्या व्यक्तीचा मूड खराब होण्याचीच शक्यता जास्त असते. मात्र अशावेळी दुसरे काय विचार करतात हे विचार तुम्ही करु नका. ४. प्रेमभंगाचा विचार दूर सारा प्रेम होणे आणि प्रेमभंग होणे या घटना तरुणांच्या आयुष्यात घडत असतात. यामुळे निराशा येणे स्वाभाविक असले तरीही हा विचार एका मर्यादेपेक्षा जास्त करणे त्रासदायक ठरु शकते. यामुळे विनाकारण दु:ख येऊ शकते. पण तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही भूतकाळाचा आणि भूतकाळातील नातेसंबंधांचा विचार करणे बंद करा. ५. भविष्याचा विचार करणे अनेकांना रोज आपले भविष्य पाहायची सवय असते. त्यावरुन त्यांचा दिवस कसा जाणार हे ठरते. मात्र एखाददिवशी भविष्य चांगले नसेल तर असे लोक लगेचच निराश होतात. एखाद्या ठिकाणी दिलेले आपले भविष्य कायम बरोबरच असेल असे नाही. त्यामुळे त्यावर अवलंबून न राहता तुम्ही तुमच्या पद्धतीने आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.