लग्न हा मुला-मुलींच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. आयुष्याच्या या नव्या टप्प्यात पाऊल टाकताना हल्ली मुला-मुलींना अनेक प्रश्न सतावत असतात. यातही मुलींना जास्त अपेक्षा असल्याचे पाहायला मिळते. मी तर नोकरी करते, त्याच्या इतकाच वेळ घराबाहेर असते, घरातल्या इतरही जबाबदाऱ्या पार पाडते मग त्यालाही काही गोष्टी यायलाच हव्यात, असे त्यांचे मत असते. शादी डॉट कॉम या मॅट्रिमोनियल साईटने नुकतेच एक सर्वेक्षण केले. अनेक भारतीय मुलींना आपल्या संभाव्य नवऱ्याला जेवण बनवता येते का हे जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुलींनी मुलांच्या मागणीला हो म्हणावे यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे माहिती करुन घेणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन पोलमध्ये ६८०० जणांकडून (४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुष) प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या. जोडीदाराला निवडताना इच्छुकांनी हो म्हणण्याआधी कोणते महत्त्वाचे तीन प्रश्न विचारले हे सर्वेक्षणामध्ये जाणून घेण्यात आले. यामध्ये ३६ टक्के महिलांनी मुलगा वेगळा राहतो की एकत्र कुटुंबपद्धती आहे असे विचारले तर ३० टक्के मुलींनी माझ्या करिअरला तुझा पाठिंबा आहे का असे विचारले. याशिवाय आश्चर्याची गोष्ट म्हणजे २६ टक्के महिलांनी जेवण बनवता येईल का, असे विचारले. मात्र पुरुषांच्याबाबत ही आकडेवारी काहीशी वेगळी होती. ३६ टक्के पुरुषांनी तुला माझ्या कुटुंबाबरोबर राहण्याची इच्छा आहे का, तर ३४ टक्के पुरुषांनी लग्नानंतर नोकरी करण्याचा विचार आहे का असे विचारले. तर केवळ १९ टक्के पुरुषांनी मुलींना जेवण बनवता येते का असे विचारले. सर्वेक्षण करण्यात आलेले महिला आणि पुरुष २५ ते ३४ वयोगटातील होते. यावेळी पुरुष आणि महिलांना तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षित होता, असे विचारले असता अतिशय आश्चर्यकारक उत्तरे मिळाली. दोन्ही गटाकडून दिसणे हा महत्त्वाचा मुद्दा वाटत असल्याचे सांगितले गेले. ६४ टक्के पुरुषांना दिसणे महत्त्वाचे वाटते तर ५३ टक्के मुली मुलांच्या दिसण्याला महत्त्व देतात. याशिवाय करिअरमधील यश २१ टक्के मुलींना आणि समान आवडीनिवडी असणे २३ टक्के मुलींना महत्त्वाच्या वाटते.