उत्सव विशेष
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com / @chaijoshi11

मे-जून महिन्यापर्यंत लग्नाचे सगळे मुहूर्त संपतात. त्यामुळे तरुणींचं नटण्या-मुरडण्याचं हक्काचं कारण संपतं. तसंच जून महिना उजाडला की कॉलेजं सुरू व्हायला लागतात. मग तर विषयच संपतो. कॉलेज एके कॉलेज! कॉलेज सुरू होणार म्हणून खरेदीसाठी अनेक जण सरसावतात. कॉलेजसाठीची खरेदी करताना मध्येच कधीकधी एका डिझायनर लेहंग्याकडे लक्ष जातं, हळूच इमिटेशन ज्वेलरी खुणावते तर चपलांचं नवीन कलेक्शन त्याकडे खेचत असतं. मोबाइलची आकर्षक कव्हर्स दिसत असतात, ट्रेण्डी टी-शर्टकडे लक्ष जात असतं तर कधी बाइक्सच्या अ‍ॅक्सेसरीज बघून त्या घ्याव्याशा वाटतात. पण असं सगळं असून गपगुमान सरळमार्गी चालत असते ती आपली तरुणाई! जून महिन्यापर्यंत खरेदी, धमाल, नटणं, सजणं हे सगळं मनसोक्त केल्यामुळे आता त्यांना काहीच बोलायची सोय नसते. म्हणून हे यंगिस्तान वाट बघतं ते श्रावणाची! श्रावण महिन्यापासून सुरू होणारा सणांचा सिलसिला त्यांना पुन्हा एकदा अशीच धमाल करण्यास मुभा देत असतो.

सण साजरे करण्याची तरुणाईची पद्धत आता बदलली आहे. पारंपरिक पद्धतीने ते सण साजरे करतातच. पण त्याशिवायही त्यांची खास स्टाइलसुद्धा आहेच. श्रावण महिना सुरू झाला की त्यांना होणाऱ्या आनंदाचं मुख्य कारण म्हणजे सणांच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीगाठी. मग त्या मित्रपरिवाराच्या असोत, भावंडांच्या असोत किंवा नातेवाईकांच्या असोत. या सणांच्या रांगेतला पहिला सण असतो मंगळागौर. खरं तर तरुण पिढीचं, त्यातही विशेषत: मुलांचं, या सणात तसं काहीच काम नाही. पण सगळे एकत्र जमणार फक्त या विचाराने ही सगळी युवा पिढी त्या सणात उत्साहाने सहभागी होत असते. मग त्यांचं आधीपासून कोण कधी भेटणार, कोणाला सुट्टी आहे, कोण काय कपडे घालणार, मग रात्री जागरण करताना गाणी लावण्यासाठी स्पीकर कोण आणणार, गाणी पेन ड्राइव्हमध्ये कोण भरून आणणार या सगळ्याविषयी चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू असते. इतकंच नाही तर; अमुक येतेय ना तरच मी येईन, नाही तर मी कंटाळेन; अशी कबुली देऊन एकमेकांना तिथे उपस्थित राहण्याची वचनंही देतात. तिकडे मोठय़ा माणसांचं घरगुती समारंभाचं नियोजन सुरू असताना इकडे ही तरुण मंडळी त्यांच्या प्लॅनिंगमध्ये व्यग्र असते.

रक्षाबंधन हा तर त्यांचा अगदी खास सण. त्याचं कारणही तसंच आहे. एरवी मित्रपरिवारात गुंतलेले सगळे एक दिन भाई-बहन के साथ असं म्हणत तो दिवस मजेत घालवतात. त्या दिवशी ते सिनेमा, गप्पा, पत्ते, जेवण अशा सगळ्यासाठी स्वत:ला एकदम बिझी करून टाकतात. बऱ्याच दिवसांनी झालेली भेट संस्मरणीय ठरते. आणि ती भेट कॅमेऱ्यात कैद केली नाही तर ती तरुण मंडळी कशी? ते या भेटीचे सगळे क्षण फोटोत टिपतात. हे फोटो सोशल मीडियावर दिसले नाहीत तरच नवल. मग  #ू४२्रल्ल२ेी३ #ंऋ३ी१’ल्लॠ३्रेी #ऋ४ल्ल४ल्ल’्र्रे३ी ि#ेीे१्री२ असे हॅशटॅग आहेतच.

या सणासुदीच्या दिवसांमध्ये हल्ली आणखी एक गोष्ट तरुणांना आकर्षित करते. ती म्हणजे; ढोल-ताशा. अलीकडे या पथकांची संख्या झपाटय़ाने वाढली आहे. त्यात तरुणांच्या सहभागही मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. गणेशोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी ढोल वाजवायला जाण्यासाठी आवश्यक तयारी करावी लागते. त्यासाठी ते दोन-तीन महिन्यांपासून तालीम करत असतात. आपलं पथक सगळ्यात उठून दिसायला हवं यासाठी ते बरीच मेहनत घेतात. ते इतरांशी स्पर्धा करतात. पण ही स्पर्धा खिलाडू वृत्तीची असते. त्यात जोश असतो, उत्साह असतो. ताशाचा पहिला आवाज झाला की त्यांच्यात एक वेगळाच उत्साह संचारतो. ढोल-ताशावादनात शिवाजी महाराजांची केलेली गर्जना अंगावर शहारा आणते. प्रचंड वजनदार असलेला ढोल सांभाळत, नाचत ढोल वाजवणं म्हणजे त्यांच्यासाठी जग जिंकल्यासारखं असतं. ढोल-ताशा वाजवण्याला अनेक जण फॅड म्हणतात. मुलांना काय शायनिंगच मारायची असते, असंही ऐकवतात. ते असेलही फॅड. असेल ती शायनिंग, पण त्यात तरुणांना आनंद मिळतो. त्या निमित्ताने ते सणांच्या दिवशी वेगळ्या स्वरूपाचा आणि त्यांना हवा तसा अनुभव घेतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू झाला की वेगवेगळ्या सणांच्या दिवशी यांना प्रचंड मागणी असते. आणि म्हणूनच तरुणाईला या चार महिन्यांची प्रतीक्षा असते.

दही हंडीचं सेलिब्रेशन तर त्यांच्या लेखी आणखी वेगळं असतं. सामान्यपणे बरीचशी तरुण मंडळी या दिवशी सुट्टी असते असं म्हणूनच बघते. कारण या दिवशी कोणाकडे जायचं नसतं की कोणाला घरी बोलावायचं नसतं. त्यामुळे ‘ही आपली सुट्टी’ असं म्हणत त्यांना हवा तसा ते तो दिवस घालवत असतात. मग अख्खी गँग सिनेमाला जाईल किंवा एकाच्या घरी बसून टाइमपास करेल. चॉइस त्यांचा आहे! काही जण दहीहंडीच्या ठिकठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांचे प्रेक्षक म्हणून जातात. दहीहंडीला आता मिळालेलं व्यावसायिक रूप दुर्लक्षित केलं तर बाकी वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. तरुणांचं सळसळत रक्त, त्यांच्या डोळ्यांत दिसत असलेली स्वप्नं ठळकपणे जाणवतात.

पण या चातुर्मासाची सुरुवात होण्याआधी प्रत्येक तरुण कॅलेंडर बघून कोणता सण कधी आहे, सुट्टी आहे का, रविवार येतोय का, कोण कोण भेटू शकेल याची गणितं आखायला घेतो. त्यांना कदाचित त्यांच्या आधीची पिढी ज्या पद्धतीने सण साजरा करते तसं करायचं नसतं; पण त्यांना तो दिवस साजरा नक्की करायचा असतो. ग्रुपमधल्या अनेकांकडे गणपती बसत असतील तर अशा वेळी पहिल्याच दिवशी कोणाकडे कधी जायचं याचं रीतसर नियोजन केलं जातं. ठरलेली वेळ जवळ आली की कोण, कुठे पोहोचलं, कोणाला उशीर होतोय या सगळ्याचे लाइव्ह अपडेट्स व्हॉट्सअ‍ॅपवर सुरूच असतात. त्यातल्या एकाने जरी कल्टी मारली तर त्याचं पुढच्या भेटीत काही खरं नसतं. हे झालं एकमेकांकडे जाऊन गणपतीचं दर्शन घेण्याचं. ही मंडळी अनेकदा ठरवून एक दिवस एकाकडे असं करत सगळीकडे आरती म्हणण्यासाठी जातात. या निमित्ताने सगळे भेटतील आणि भेटून नेहमी गप्पा मारण्यापेक्षा हा काही तरी वेगळं करू म्हणून सगळी गँग बाप्पाच्या आरतीसाठी जमते आणि पूर्ण जोशात मोठय़ा आवाजात हा आरती म्हणण्यात ही युवा पिढी दंग असते.

नवरात्रीत दांडिया, गरबा या तर त्यांच्या आवडीच्या गोष्टी. आता कॉलेज, ऑफिसमुळे रोजच्या रोज ते खेळायला जाता येत नाही. अशा वेळी सगळ्यांच्या सोयीनुसार एक दिवस ठरवून ते खेळायला जातात. तो एक दिवस कायम लक्षात राहील असा घालवला जातो. दसरा, नारळीपौर्णिमा, अनंत चतुर्दशी या सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांच्यासाठी भेट महत्त्वाची असते.

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा काहीशी दुर्लक्षित केली जाते. तरुणांच्या मनात त्यांनी जपलेली संवदेनशीलता. गरजू लोकांना मदत, आश्रमांना भेट, अनाथ मुलांसाठी वेगवेगळ्या कलांचं प्रशिक्षण अशा अनेक गोष्टी आयोजित करणारेही अनेक गट आहेत. ते वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने असे उपक्रम आयोजित करतात. अर्थात इथेही सगळे एकत्र भेटण्याचा उद्देश असतोच. पण तो विशिष्ट एका कारणासाठी असल्यामुळे त्याचं समाधान द्विगुणित होत असतं.

खरं तर सण-समारंभ यात तरुण पिढीला फार स्वारस्य नाही असं म्हटलं जातं. ते काही अंशी खरंही आहे. त्यांची सण साजरा करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. त्यांच्यासाठी सणांचं महत्त्व वेगळ्या स्वरूपाचं असतं. सणांच्या प्रथा-परंपरा आम्हाला जमतील तशा आम्ही सांभाळूच. पण त्याशिवाय सणांमध्ये विशेष रस असण्याचं कारण म्हणजे त्या दिवशी आम्हा मित्रपरिवार, नातेवाईकांची होणारी भेट हे आहे; असं या तरुण वर्गाचं म्हणणं असतं. उत्साह असतो. युवा पिढीचं या चार महिन्यांतल्या सणांचं सेलिब्रेशन म्हणजे भेटींचा उत्सवच असतो.
सौजन्य – लोकप्रभा