तोंडाच्या आणि दाताच्या सफाईपासून अन्नपचनाच्या कामापर्यंत मदत करणारी लाळ हा आपल्या शरीरातील दुर्लक्षित घटक. थुंकी, तोंडाचा वास या नकोशा गोष्टींचीच जोडला गेलेला. पण प्रत्येक व्यक्ती दिवसाला साधारण दीड लिटर लाळ तयार करते आणि लाळेचे कार्य थंडावले की अनेक आजारांना तोंड द्यावे लागते याची कल्पनाच अनेकांना नसते. या लाळेविषयी ही शास्त्रीय आणि वैद्यकीय माहिती.. तोंडात येणारी लाळ तयार करणाऱ्या ग्रंथींना ‘लाळग्रंथी’ म्हटले जाते. लाळ तयार करणाऱ्या ग्रंथी अनेक आहेत. त्यातील तीन महत्त्वाच्या आहेत. पॅराटाइड, सबमॅडिब्युनल आणि सबिलग्वल या त्या तीन ग्रंथी. त्यातील पॅरोटाइड या ग्रंथी जबडय़ाच्या जवळ कानाच्या दिशेला असतात. सबिलग्वल जीभेच्या खाली असतात. या ग्रंथीमध्ये सिरस आणि म्युकस या दोन प्रकारच्या पेशी असतात. सिरस पेशीमधून पाणी, सोडिअम आणि एंझाइम (अन्नाच्या पचनाचे कार्य) यांचा प्रवाह असतो. म्युकस पेशीत म्युसिन नावाचे प्रथिन (अन्ननलिकेतून अन्न सुरळीत जाण्यास मदत करणारे) असते. लाळग्रंथीत तयार झालेली लाळ नलिकेवाटे तोंडात येते. लाळग्रंथीतून ही लाळ नलिकेत आली की रक्तपेशी आणि लाळ यांच्यामध्ये काही घटकांची अदलाबदल होते. लाळ रक्तातून पोटॅशिअम बायकाबरेनेट शोषून घेते तर रक्त लाळेतून सोडिअम क्लोराइड (मिठाचे रासायनिक सूत्र) शोषते. सोडिअम क्लोराइड बाहेर टाकल्यामुळे लाळेतील पाण्याचे प्रमाण कमी होते. मीठ (सोडिअम क्लोराइड) अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्याने रक्तदाब वाढतो. या अदलाबदलीच्या प्रक्रियेनंतर लाळग्रंथीतील सोडिअमचे प्रमाण कमी आणि पोटॅशिअमचे प्रमाण वाढते. ही लाळ तोंडात सातत्याने पाझरत राहते. लाळग्रंथी आणि मज्जासंस्थेतील संवाद एखादा आवडता खाद्यपदार्थ किंवा खाण्याचा सुगंध आला की तोंडाला लगेच पाणी सुटते. ही लाळच असते. ही प्रक्रिया खूपच सहज होते. लाळग्रंथीचा संबंध मेंदूतील मज्जासंस्थेशी जोडला गेला आहे. एखादा आवडता पदार्थ दिसल्यावर दृष्टीतील पेशींमधून हा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो आणि लाळग्रंथींना मज्जासंस्थेकडून आदेश आल्यावर तोंडात लाळ तयार होते. हीच प्रक्रिया सुगंध आल्यावरही लागू होते. या सर्व क्रिया अतिशय जलदगतीने होतात. - डॉ. अमित नवरे, शरीरविज्ञानशास्त्र विभाग, लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय लाळग्रंथींचे आजार सर्वसाधारणपणे लाळग्रंथी दरदिवसाला दीड लिटर लाळ तयार करतात. हे प्रमाण बहुतांश व्यक्तींमध्ये सारखेच असते. मात्र काही आजार असल्यास किंवा व्यसन असल्यास हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. सर्वसाधारणपणे लाळग्रंथीचे आजार दुर्मीळ आहेत. संसर्ग झाला असल्यास किंवा ग्रंथीत लाळेचा खडा झाल्यास लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. हे खडे लाळग्रंथीवर चिकटून बसतात. यामुळे लाळ बाहेर पडत नाही आणि लाळ तयार न झाल्यामुळे तोंड कोरडे राहते. यातून अनेक आजार होण्याची शक्यता असते. लाळग्रंथींचे कार्य पदार्थाची चव कळण्यासाठी जिभेसोबत लाळ महत्त्वाचे काम करते. लाळ जिभेवरील रिसेप्टरसोबत मिसळल्याने जिभेला पदार्थाची चव कळते. लाळेचे प्रमाण कमी असेल तर चव ओळखण्यास अवघड जाते. गरम पदार्थ तोंडात घातल्यावर जीभ भाजली जाऊ नये किंवा जास्त प्रमाणात चटके बसू नयेत म्हणून अधिक प्रमाणात लाळ तयार होते. लाळ गरम पदार्थ थंड करण्याचे काम करते. लाळेतील लायसोझाइन हा घटक जिवाणूंचा नाश करतात. दातांवर तयार होणाऱ्या जिवाणूंचा नाश करण्याचे काम लाळ करीत असल्याने एक प्रकारे लाळ दातांचे आरोग्य चांगले ठेवते. एखाद्या आजारात किंवा तोंडात संसर्ग झाला असल्यास लाळ थुंकल्यावर हा संसर्ग तोंडावाटे बाहेर टाकला जातो. हिरडय़ांचे आरोग्य चांगले राखण्यासाठीही लाळेची मदत होते. दातांचे दुखणे कमी करण्यासाठी लाळेतील ऑपिहोरपी हे घटक मदत करतात. बोलताना जिभेची हालचाल वेगाने होत असल्याने तोंड कोरडे पडू शकते. मात्र बोलणे सुरू असतानाही सातत्याने लाळ पाझरत असल्याने तोंडातील ओलावा कायम राहतो व बोलण्यात अडचणी येत नाहीत. मात्र काही वेळा बोलण्याचा वेग हा लाळ पाझरण्याच्या वेगापेक्षा अधिक झाला तर मात्र तोंड कोरडे पडल्याचा अनुभव येतो. अन्न कोरडे जरी असले तरी लाळेमुळे ते मऊ होते आणि अन्न गिळताना सोईचे पडते. अन्नाची पचनाची प्रक्रिया प्रथम तोंडातून सुरू होते. अन्नाचे पचन चांगल्या पद्धतीने केले जावे यासाठी अन्न मऊ करून पाठविण्याचे काम लाळ करीत असते. झोपल्यावर मात्र लाळ तयार होण्याचे प्रमाण अगदीच कमी होते. दात स्वच्छ करणारी लाळ कमी झाल्यामुळेच रात्रभर झोपल्यानंतर सकाळी दातांचा दरुगध येतो.