कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ. यापूर्वी आपण डेंग्यूसाठीचा आहार बघितला आहे. आता डेंग्यूसह चिकुनगुनियाचाही विचार करूया. केवळ ताप आल्यावरच नव्हे, तर इतर वेळीही कोणते पदार्थ आहारात असायला हवेत, हे बघूया. आजार झालेला नसतानाही चिकुनगुनियाच्या बाबतीत ‘डी-थ्री’ आणि ‘बी-१२’ या जीवनसत्त्वांची नावे खूप जणांकडून ऐकायला मिळाली असतील. शरीरात ‘डी-थ्री’ व ‘बी- १२’ची कमतरता असेल तर चिकुनगुनियात होणाऱ्या सांधेदुखीचा त्रास रुग्णासाठी अधिक त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. ‘डी-थ्री’ची कमतरता असते तेव्हा शरीरात ‘कॅल्शियम’ कमी शोषले जाते. अंडय़ाच्या पिवळ्या भागातून ‘डी-थ्री’ जीवनसत्त्व व ‘ल्युटिन’ हे अँटिऑक्सिडंट मिळते. ‘बी-१२’ हे जीवनसत्व शरीर स्वत: तयार करते. विशिष्ट आजारांवर जेव्हा अँटिबायोटिक्सचे डोस दिले जातात तेव्हा शरीरातून ‘बी- १२’ बाहेर निघून जाते. परंतु सर्व प्रकारच्या भाज्या व फळे आहारात नियमितपणे घेतल्यास शरीर पुन्हा स्वत:चे- स्वत: ‘बी-१२’ तयार करण्यासाठी सक्षम होते. आजार झालेला नसतानाही नेहमी आपल्या आहारात हे पदार्थ असल्यास ‘डी- थ्री’ व ‘बी-१२’ची कमतरता टाळता येईल. रुग्णांसाठी चिकुनगुनियाचा विषाणू हाडांच्या मधल्या जागेत असलेल्या वंगणावर (इन्ट्रासेल्युलर फ्लुइड) हल्ला करतो. हे वंगण वाळल्यामुळे शरीर ताठर होते व हात, पाय, बोटे, मनगट, कोपरे असे सांधे दुखतात. तर डेंग्यूमध्ये शरीरातील पाणी आणि रक्तातील ‘प्लेटलेटस्’ कमी होतात. या दोन्ही आजारांच्या उपचारांदरम्यान भरपूर पाणी पिण्यास सांगितले जाते. शरीराचे ‘हायड्रेशन’ राखणे आवश्यक असले तरी नुसते खूप पाणी पिणे शक्य होत नाही. शिवाय पाण्याबरोबर रुग्णाची ताकद टिकून राहावी यासाठी ‘इलेक्ट्रॉल’सारखे घटकही द्यावे लागतात. रुग्णाच्या आहारात ‘अँटिऑक्सिडंट’ भरपूर असलेले नैसर्गिक पदार्थ असले तर फायदा होतो. अँटिऑक्सिडंट्स डेंग्यू झाल्यावर कीवी किंवा ड्रॅगनफ्रुट खाल्ल्यास प्लेटलेटस् वाढतात, असे संदेश सध्या व्हॉटस्अॅपवर फिरत आहेत. ही महागडी फळे अगदी नाक्यानाक्यावर विक्रीस ठेवलेली दिसू लागली आहेत. ही फळे खाल्ल्यामुळे प्लेटलेटस् वाढतात की नाही, याला शास्त्रीय पुरावा नाही. परंतु कीवी व ड्रॅगनफ्रुटमधून ‘अँटिऑक्सिडंटस्’ मिळतात हे खरे असले तरी म्हणून केवळ हीच फळे खायला हवीत, असे नव्हे. तुलनेने स्वस्त दरात मिळणाऱ्या पपई, चिकू, संत्रे, मोसंबे, डाळिंब, अननस, केळी, अंजीर, पेरू, आवळा या फळांमध्ये तसेच फ्लॉवर, कोबी या भाज्यांमधूनही चांगली अँटिऑक्सिडंटस् मिळतात. यातील कोणतीही फळे व भाज्या आहारात असल्यास रोगप्रतिकारशक्ती व ‘प्लेटलेट काऊंट’ वाढण्यास मदत होऊ शकते. रुग्णांना डाळिंबाचा रस, विविध फळांचे रस, बीटरूट, गाजर व टोमॅटोचा रस, आवळ्याचे गोड वा मीठ घातलेले सरबत, तांबडा भोपळा, गाजर, पालक अशा विविध भाज्यांची सूप देता येतील. त्यातून ‘अ’ जीवनसत्त्व व अँटिऑक्सिडंटस् देखील मिळतात. ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त फळांमध्ये ‘अँटिइन्फ्लमेटरी’ गुणधर्मही असून त्यामुळे दुखण्यावर आराम पडण्यास मदत होते. शहाळ्याचे पाणी व उसाचा स्वच्छ व ताजा रसही चांगलाच. अर्थात इथे सांगितलेले सर्व पदार्थ सामान्यत: सर्वाना काय चालू शकेल त्याचा विचार करून दिले आहेत. मधुमेहाचे रुग्ण, लहान मुले, विशिष्ट पदार्थाची अॅलर्जी असलेले वा इतर काही आजार असलेल्या रुग्णांना प्रकृतीनुसार वेगळा आहार लागू शकतो. प्रथिने व इतर अन्नघटक * वरण वा मूगडाळीचे सूप, मूगडाळ खिचडी हे पदार्थ रुग्णांना दिवसातून ३-४ वेळा थोडे-थोडे देता येतात. त्यातून चांगल्या प्रकारची प्रथिने मिळतात. तसेच मूग, मटकीसारखी कडधान्ये शिजवून त्याच्या उसळी किंवा चिकन क्लिअर सूपही देता येईल. * अक्रोड व बदामातून ‘ओमेगा-थ्री फॅटी अॅसिडस्’ मिळतात. त्यामुळेही रोगप्रतिकारशक्ती व प्लेटलेट काऊंट वाढण्यास मदत होऊ शकते. पण ते पचायला जड असल्यामुळे अल्प प्रमाणात व शक्यतो आधी भिजत घालून देता येईल. * जेवणात पोळी घेता येईल. नाचणीची लापशी, तांदळाची पेज यामुळेही चांगले पिष्टमय पदार्थ मिळतात व पोटाला थंड वाटते. * मधल्या वेळी थोडे मखाणे तुपात भाजून खायला देता येतील. * गाईच्या पातळ दुधाचा उकाळा करून त्यात गूळ व हळद घालून घेता येईल. त्यामुळे सांध्यांची सूजही कमी होण्यास मदत होते. या आजारांमधून बरे होताना पदार्थामध्ये साखर घालणे शक्यतो टाळावे. त्याऐवजी कमी प्रमाणातच, पण मध वा गूळ वापरावा. * गाईच्या दुधाचे घरगुती पनीरही रुग्णांना आहारात देता येईल. या पनीरची भुर्जी वा भाजी पोळीत भरून उत्तम लागते. * विशेषत: चिकुनगुनियामध्ये व डेंग्यूतही ‘काबरेनेटेड ड्रिंक्स’ टाळावीत. मैदायुक्त पदार्थ शक्यतो वज्र्य करावेत. प्रक्रिया केलेले व ‘प्रीझव्र्हेटिव्ह’ घातलेले पदार्थही रोगप्रतिकारक शक्तीला अपायकारकच ठरत असल्यामुळे तेही टाळावेत. * डेंग्यूमध्ये औषधोपचार व इतर आहाराबरोबर पपईच्या पानांचा वापर कसा करावा याबद्दलही अनेकदा विचारणा होते. पपईची चार-पाच कोवळी पाने धुऊन पाणी घालून वाटून घ्यावीत व त्याचा रस काढून गाळून घ्यावा. मोठय़ा माणसांनी हा रस २-२ चमचे असा दिवसातून ४ वेळा घ्यावा. मात्र प्रत्येक वेळी ताजा रस काढून घ्यावा. घरच्या घरी गहू पेरून त्याच्या उगवलेल्या पानांचा ‘व्हीटग्रास ज्यूस’ही रोज थोडा घेता येईल. (शब्दांकन- संपदा सोवनी)