मला एकच प्रश्न अनेक वर्षे पडलेला आहे : छापखान्यात काम करणाऱ्या माणसाची भूमिका असेल तर कलाकार छापखान्यात जातात. वेश्येची भूमिका असेल तर त्या विभागात सफर करून येतात. पण जर कोणी सतीच्या प्रथेबद्दल चित्रपट निर्माण करायचं ठरवलं तर त्या अभिनेत्रीला तिचा अभ्यास पूर्ण करून जिवंत परत येता येईल का?

गेली काही र्वष सगळीकडे मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आल्याची हाकाटी अत्यंत जोमाने दुमदुमते आहे. वर्षांतल्या एकंदरीत बावन्न आठवडय़ांतल्या प्रत्येक शुक्रवारी एक तरी मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतो. कधी कधी दोन ते चार वेळेला पाच-पाच चित्रपटही प्रदर्शित होतात. अशा चित्रपटांच्या निर्मितीला सुरुवात कशी आणि कुठून होते, हे सर्वसामान्य प्रेक्षकांना नेमकं ज्ञात नाहीये. एक पटकथा आणि संवादलेखक म्हणून व कलाकार म्हणून या निर्मितीशी माझा संबंध आलाय म्हणून त्याबद्दल प्रेक्षकांना थोडीशी माहिती मिळावी, या हेतूने आजच्या लेखाचे प्रयोजन आखले आहे.

Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
marathi movie hoy maharaja
प्रथमेश परबचा ‘होय महाराजा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, मराठी विनोदवीरांची चित्रपटात मांदियाळी

कशाचीही निर्मिती करायची झाली (अगदी कचऱ्यातून कलाछाप निर्मिती करायची असली तरीही त्यासाठी तो कचरा निर्माण करणारा निर्माता लागतोच!) तर एक निर्माता लागतो. हा निर्माता हल्ली बहुतेक वेळा ‘आपल्याला एका चित्रपटाची निर्मिती करायची आहेच बुवा!’ असा विचार मनात बाळगणारा कुणीतरी उद्योगपती असतो. पूर्वी नाटकांच्या निर्मात्यांत विविध सरकारी खात्यांत काम करणारे लोक असायचे. सेल्स आणि ऑक्ट्रॉय खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी काही काळ मराठी नाटय़सृष्टी जगवत ठेवली होती. आता त्यांच्याकडे तो पसा कुठून आला होता, याचं संशोधन करायची ही वेळही नाही आणि जागाही! हे सगळे कर रद्द होऊन फक्त gst आल्यामुळे मराठी रंगभूमीची जी अपरिमित हानी झाली आहे ती इथे शब्दांत आणि आकडय़ांत मांडता येणार नाही. असो!

..तर चित्रपटासाठी एक निर्माता लागतो. अर्थात सोनेरी दिवस आल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे तो मिळायला आजकाल एखाद्या बुवाला किंवा बाबाला जसे भक्त जमवायला अडचण पडत नाही, तसेच निर्माते मिळवणंही सोपं झालंय. त्यातून जर अशा निर्मात्याला सामाजिक विषमता किंवा अन्याय असल्या गोष्टींनी मानसिक डंख मारला असेल तर मग काम अजून सोपे होते. काही निर्माते दुसऱ्या एका गटात मोडतात. त्यांच्या मुलांना किंवा मुलींना अभिनयाच्या मृगजळाने भुलवल्यामुळे पालकांचे कर्तव्य म्हणून त्यांना चित्रपट निर्माण करायचे असतात. या व्यवसायात अलीकडे जे वावरू लागले आहेत त्यांनाही चित्रपट या माध्यमाबद्दल अजून पुरेशी माहिती नाही, तर बिचाऱ्या या नवख्या निर्मात्याला कुठून असणार? पण एकंदरीतच आसपास निर्माण होणाऱ्या चित्रपटांची व दरवर्षी त्यांची वाढत जाणारी संख्या पाहून ज्या अर्थी इतके लोक निर्माते म्हणून या क्षेत्रात येत आहेत त्या अर्थी त्यात भरपूर पसा असणार अशी अटकळ बांधून नवा निर्माता त्यात उडी घेतो.

कोणाला तरी चित्रपट निर्माण करायचा आहे म्हटल्यावर त्याचा वास सगळीकडे पसरतो. आणि या निर्मात्याच्या आजूबाजूला गर्दी जमू लागते. त्यातला एखादा अमुक अमुक चित्रपटाला कुठारवाडी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचे, किंवा माझ्या मागच्या चित्रपटाला लोकांनी प्रचंड दाद दिली आहे असं सांगून आपला भाव फुगवतो. निर्माता खूश होऊन त्याला ‘पुढचा चित्रपट माझ्यासाठी करायला आवडेल का?’ अशी विचारणा करतो. ताबडतोब त्याला होकार न देणं ही व्यावसायिक चतुरता दाखवून तो दिग्दर्शक अजून एक-दोन चित्रपटांवर काम चालले आहे असं सांगतो. पण तेही हा चित्रपट हातातला जाणार नाही अशा शब्दांत! मग  निर्माताही आपलं व्यवसायचातुर्य (?) दाखवून त्याला आपल्याकडे ओढून घेतो.

पहिल्या एक-दोन भेटींत घातलेल्या पशांचा परतावा काय असेल, याबद्दल चर्चा केली जाते. निर्मात्याला निदान एक-दोन कोटी तरी कसे आरामात सुटतील याबद्दल ठासून सांगितले जाते. त्याचे आकडे कागदावर नाचवले जातात. बिचाऱ्या पोलादबिलाद असल्या धंद्यावर आयुष्य काढलेल्या माणसाचा नृत्याशी संबंध नसल्याने तो आकडय़ांचा नाच त्याला खरा वाटतो. चित्रपटाची कथा कशी असावी यावरही चर्चा होते. चर्चाच जास्त होते.

सामाजिक, शैक्षणिक, विनोदी, समस्याप्रधान, रहस्यमय आणि अन्यायबिन्यायवाले अशा सगळ्या प्रकारच्या चित्रपटांत काम करणाऱ्या कलाकारांचे ठरलेले संच आणि पंथ असतात. एकदा कथा ठरली की कथेनुसार कलाकार निवड होऊन जाते. भूमिकेचा अभ्यास करणाऱ्या कलावंतांचा जो एक पंथ आहे, तो जर यात असेल तर कथेतल्या पात्रानुसार त्या- त्या ठिकाणी जाऊन तो अभ्यास करून येतो. मला एकच प्रश्न अनेक वर्षे पडलेला आहे : छापखान्यात काम करणाऱ्या माणसाची भूमिका असेल तर कलाकार छापखान्यात जातात. वेश्येची भूमिका असेल तर त्या विभागात सफर करून येतात. पण जर कोणी सतीच्या प्रथेबद्दल चित्रपट निर्माण करायचं ठरवलं तर त्या अभिनेत्रीला तिचा अभ्यास पूर्ण करून जिवंत परत येता येईल का? असो.

..तर कलाकारांची निवड होते. कथा, पटकथा आणि संवाद या आघाडीवर काम सुरू होते. त्यात पुन्हा एक प्रश्न आहे. हे काम सगळ्यात आधी पूर्ण होते. कारण ते झाले नाही तर चित्रपटात पात्रं बोलणार काय? पण तरीही लेखकाची नुकसानभरपाई (माफ करा किंवा नका करू.)- म्हणजेच मानधन सगळ्यात शेवटी का दिले जाते?

चित्रपट आकार घेऊ लागतो कागदावर. इकडे चित्रीकरण स्थळ पाहायला काही लोक जाऊन येतात. दर चित्रपटाला जातात. खरं तर सगळीकडे थोडय़ाफार फरकाने डोळ्याला चित्रपट बघताना काहीच फरक जाणवत नाही. एकदा आमचे महेश मांजरेकर कोकणात जाऊन ‘काकस्पर्श’ करून आले. तो चित्रपट यशस्वी झाला. ताबडतोब अगदी अणुस्फोटापासून ते प्रेमकथेपर्यंत सगळ्या कथा कोकणात खेचल्या गेल्या.

त्यानंतर गीतकार आणि संगीतकार व निर्माता यांची प्रथम भेट होते आणि आर्थिकगणित जुळल्यावर दिग्दर्शक व ते दोघे भेटतात. चित्रपट एकच असला आणि त्यात चारच गाणी असली तरी हल्ली संगीतकार दोन-तीन जण असतात. कशासाठी, असं विचारलं तर मला उत्तर मिळालं की, अमुकच गाणी तमुक संगीतकाराला येतात. त्यामुळे उरलेल्यांसाठी दुसरा किंवा तिसरा संगीतकार नेमला आहे. विचित्र आहे की नाही? पूर्वी मराठी सिनेमात सुधीर फडके, राम कदम, दत्ता डावजेकर, वसंत देसाई हे संगीतकार एकाच चित्रपटातली वेगवेगळा पोत असणारी गाणी एकहाती संगीतबद्ध करायचे. आणि तेही त्या काळातली वेळखाऊ तांत्रिक बाब हिशोबात घेऊन! मग आज काय झालं? हल्ली  गाणी इतक्या ठिकाणी वाजतात. परत  चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी काही दिवस त्या गाण्यांचा MUSIC LAUNCH नावाचा सोहळा समाजमाध्यम प्रतिनिधींना तीर्थप्रसादाचा मुबलक आनंद लुटायला देऊन साजरा होतो, तरीही ती सहा महिन्यांत आपल्या कानामागे पडतात. आणि आजही जुनी गाणी आठवत राहतात. त्यातल्या वाद्यमेळासकट! याला काय म्हणायचं?

वर्तमानपत्रांतून चित्रीकरण सुरू झाल्याच्या बातम्या झळकवून घेतल्या जातात. नृत्य दिग्दर्शक आणि केशभूषा व वेशभूषा करणाऱ्या व्यक्तींच्याही मुलाखती हल्ली छापून येतात. त्यात ते ‘चित्रपटातल्या पात्रांची सामाजिक आणि भावनिक गुंतणूक लक्षात घेऊन मी काम केलं आहे,’ असं सांगतात. राज कपूर यांच्या चित्रपटांतल्या एकाही नायिकेच्या वेश आणि केशभूषेबद्दल एक ओळही लिहून आल्याचं मला मेंदूला खूप ताण देऊनही आठवत नाही. तरीही त्या चित्रपटांतून लोकांना काय बोध घ्यायचा तो मिळाला.. आणि बघायला तर मनसोक्तच मिळालं. ‘शम्मी कपूरच्या नृत्यातल्या करामतींत  सामाजिक आशय आहे,’ असं काही त्या काळातल्या नृत्य दिग्दर्शकांनी कुठे लिहून आणल्याचं स्मरत नाही.

हे सगळे होत असताना एकीकडे चित्रीकरण सुरू असतं. आणि दुसरीकडे कलाकार आपण अभिनेते आहोत हे विसरून, स्वत:ला लेखक समजून आपण साकार करत असलेल्या भूमिकेबद्दल लिहून आणवतात. जे काय आहे तुमच्या मनात किंवा अंतर्मनात (हे एक कलाकारांचं नवीन मन निर्माण झालं आहे.)- ते पडद्यावर दाखवून द्या ना! आजकाल अभिनय करण्यापेक्षा त्यावर बोलणं जमलं पाहिजे. बिचारे आमचे डॉ. श्रीराम लागू! ‘मला भावलेला नटसम्राट’ असा काही लेख न लिहिता इमानेइतबारे रंगभूमीवर तब्बल दोनशे प्रयोग उत्कृष्ट अभिनय करत राहिले. आधीही आणि नंतरही.

शेवटी चित्रपट पूर्ण होतो. पुढच्या प्रक्रियेला पाठवला जातो. दरम्यान, लोकप्रिय कलाकारांबरोबर भरपूर वेळ घालवायला मिळाल्याने आणि कलाकारांनी तो निर्माता आहे हे ओळखून तो वेळ देऊ केल्याने निर्माता खूश असतो. त्याचे नातेवाईक, कुटुंबीय, सखेसोबती हेही चित्रीकरण बघून तृप्त होतात.

आता सगळ्यांना चित्रपटाची जाहिरात करायची घाई झालेली असते. कुठल्या तरी मॉलमध्ये कलाकारांना घेऊन जातात. तिथे लोक आजच्या धकाधकीच्या आणि घडय़ाळाच्या काटय़ावर धावायची सवय लागलेल्या काळात या कलाकारांना बघून त्यांच्या चित्रपटाला तोबा गर्दी करतील असं ज्याला वाटलं असेल त्याला- आणि वर ही कल्पना निर्मात्याच्या गळी उतरवणाऱ्या माणसाला सलाम! जे इतर वेळेला घरच्या घरी छोटय़ा पडद्यावर नाइलाजाने बघावेच लागतात त्यांच्यावर ऐन खरेदीच्या घाईत चार क्षण कोण फुकट घालवणार? हे सगळं करण्याऐवजी  त्या पशांची तिकिटे सन्मानिका म्हणून वाटली तर जास्त जाहिरात नाही का होणार? कारण मानव हा फुकट ते पौष्टिक यावर श्रद्धा ठेवून जगणारा प्राणी आहे. तरीही असे अनेक प्रकार करून जाहिराती केल्या जातात. त्याची सगळी छायाचित्रे अदरेखून निर्मात्याला पाठवली जातात. तोही आपण लवकरच एका यशस्वी चित्रपटाचे भावी निर्माते होणार, या स्वप्नात मश्गूल असतो. त्या कैफात तो आपल्या उद्योगातल्या कामगारांशी नीट वागतो. कामगार थक्क होतात.

आणि एकदाचा ‘तो’ दिवस उजाडतो.

ते नंतरच्या भागात. अर्थात तेही नक्की नाही, बरं का!

sanjaydmone21@gmail.com