विश्वनाथन आनंदविषयी सर्व जगभरात आदराची भावना आहे. त्यामुळे त्यांच्यावर सन्मानाचा वर्षाव होत असतो. तुम्ही म्हणाल की, पाच वेळा जगज्जेता राहिलेल्या खेळाडूवर बुद्धिबळप्रेमी राष्ट्रांमधील लोक प्रेम नाही करणार तर कोण? परंतु ज्या देशात बुद्धिबळ फार खेळले जात नाही, तेथेही आनंदविषयी आदराची भावना आहे..

गेल्या आठवडय़ात आपण आनंदचं गॅरी कास्पारोव्ह आणि अनातोली कार्पोव यांच्याशी जगज्जेतेपदासाठी झालेले पराभव पाहिले. परंतु कस्तुरीचा सुगंध कितीही प्रयत्न केला तरी दडत नाही, त्याप्रमाणे आनंदच्या प्रतिभेला कोणतीही शक्ती लगाम घालू शकली नाही. भारतीय बुद्धिबळाचा भाग्यविधाता आनंद खरं तर १९९८ साली जगज्जेता होऊ शकला असता, पण झाला नाही याचं कारण म्हणजे जागतिक संघटनेनं अनातोली कार्पोवला दिलेलं अवास्तव महत्त्व आणि अखिलाडू सवलती. वाचकांनी त्याच्या १९९८ सालच्या सामन्याची माहिती वाचली तर त्यांना या सामन्याच्या नियमांविषयी चीड आल्याशिवाय राहणार नाही. इतक्या अपयशांनंतरही खचून जाईल तो आनंद कसला? त्याच्या विजिगीषू वृत्तीनं गेलं सहस्रक उलटता उलटता त्यानं जगज्जेतेपद खेचून आणलं.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?

१९९८ साली आव्हानवीर ठरवण्यासाठी हॉलंडमधील ग्रोनिंगन या शहराची निवड करण्यात आली होती. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या धर्तीवर बाद पद्धतीनं १०० खेळाडूंमध्ये हे सामने होणार होते. मात्र जगज्जेता म्हणून कार्पोवला यामध्ये न खेळण्याची सूट होती. या अन्यायामुळेच क्रॅमनिकनं ग्रॉनिंगनला न खेळण्याचं ठरवलं होतं. ‘‘तुम्ही पीट सॅम्प्रासला फक्त अंतिम सामना खेळून विम्बल्डनमध्ये आपलं गेल्या वर्षीचं अजिंक्यपद राखायला सांगाल का?’’ अशी टीका त्यानं केली होती. गॅरी कास्पारोव्हनंसुद्धा न खेळण्याचं ठरवलं आणि त्यामुळे आनंद अग्रमानांकित झाला.

जागतिक दर्जाच्या अनेक खेळाडूंना मात देऊन आणि २३ दिवसांत २१ डाव खेळून आनंद कार्पोवचा आव्हानवीर ठरला त्या वेळी तो किती दमला असेल याचा विचार करा. आणि ग्रोनिंगनच्या अंतिम सामन्यात तर त्याच्या शारीरिक आणि मानसिक दमछाकीचा कस लागला होता. सामना ४ डावांचा होता. इंग्लंडचा सुपर ग्रँडमास्टर मायकेल अ‍ॅरडम्स त्याचा प्रतिस्पर्धी होता. चारही डाव तुंबळ युद्धानंतर बरोबरीत सुटले. नंतर पाचव्या दिवशी जलदगती आणि विद्युतगती सामने ही निर्णायक ठरेनात. मग सडन डेथ नियमानुसार खेळल्या गेलेल्या डावात आनंदनं बाजी मारली. लगेच ३ दिवसांत स्वित्झर्लंडमधील लॉसन येथे सहा डावांच्या जगज्जेतेपदाच्या अंतिम सामन्यासाठी ताजातवाना कार्पोव त्याची वाट बघत होताच. आनंदनं आपल्या संघासोबत विमान आणि रस्त्यांचा प्रवास करून स्वित्झर्लंड गाठलं त्या वेळी त्याला तयारीसाठी फक्त ४ तासांचा अवधी मिळाला होता. या उलट कार्पोव आठवडाभर आधी नाताळच्या बर्फातल्या थंडीला रुळला होता.

अपेक्षेप्रमाणे आनंद पहिला डाव हरला आणि आता सामना संपला असंच सर्वांना वाटत होतं. पण आनंद हा किती चिवट लढवय्या आहे याची कार्पोव कॅम्पला कल्पना नव्हती. पुढचाच डाव जिंकून आनंदनं बरोबरी साधली. पुन्हा एकदा कार्पोवनं आघाडी घेतली आणि सामना शेवटच्या म्हणजे सहाव्या डावापर्यंत पोचला. कार्पोवला फक्त बरोबरीची गरज असताना आनंदनं बाजी मारली आणि आता सामना जलदगती टाय ब्रेकरमध्ये पोहोचला. जलदगती सामन्यासाठी खेळाडू शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणं आवश्यक असतं. आनंदच्या दमछाकीचा आत्तापर्यंत कस लागला होता. त्याला त्याच्या थकलेल्या शरीरानं आणि मनानं साथ दिली नाही आणि कार्पोव पुन्हा एकदा जगज्जेता झाला. जगभर या स्पर्धेच्या अन्यायी नियमांविरुद्ध टीकेची झोड उठली. आनंद फक्त इतकंच म्हणाला, ‘‘मॅरेथॉन धावून आलेल्या खेळाडूला लगेच ताज्यातवान्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध १०० मीटर शर्यत धावायला लावण्यासारखं वाटलं.’’

२००० ते २०१० या दरम्यान आनंद एकूण तीन वेळा जगज्जेता झाला. आपण आज बघणार आहोत टोपालोव्हच्या रडीच्या डावाची कहाणी. २०१० चा विश्वविजेतेपदाचा सामना वेगळय़ाच गोष्टीमुळे गाजला. आव्हानवीर वॅसेलीन टोपालोव्हच्या बल्गेरियानं यजमानपद स्वीकारलं होतं आणि त्यांची राजधानी सोफिया इथं २४ एप्रिल रोजी सामन्यास सुरुवात होणार होती. आनंद त्याच्या संघाबरोबर स्पेनची राजधानी माद्रिदमधील त्याच्या स्वत:च्या घरी सराव करत होता आणि विमानानं १६ तारखेला निघण्याची तयारी झाली होती. पण अचानक आइसलँडमधील ज्वालामुखी जागृत झाला आणि त्यानं इतक्या मोठय़ा प्रमाणावर राख हवेत ओकण्यास सुरुवात केली की, संपूर्ण युरोपमधील विमानोड्डाणं रद्द करावी लागली. आनंदनं आयोजकांना तीन दिवस सामना पुढे ढकलण्याची विनंती केली, पण त्यांनी ती अमान्य केली. झालं! आनंद आणि त्याचा संघ मोटारीनं निघाले. अंतर किती होतं माहिती आहे का? २९८२ किलोमीटर्स आणि ते पण ६-७ देश पार करून जायचं होतं. युरोपातील रस्ते आहेत छान, पण विमानं रद्द झाल्यामुळे प्रत्येक अडलेला प्रवासी मोटारीनं निघाला होता. तब्बल ४० तासांच्या अविरत प्रवासानंतर आनंद आणि त्याचे सहकारी सोफियाला पोचले, सामना सुरू झाला आणि पहिल्याच डावात टोपालोव्हनं दमलेल्या आनंदवर मात केली. सर्वांच्या डोळय़ापुढे कार्पोव विरुद्धचा सामना उभा राहिला. १९९८ साली असंच झालं होतं, पण या वेळी टोपालोव्ह समोर अनुभवी आनंद होता. तो जगज्जेता होता आणि अखिलाडू वृत्तीच्या विरुद्ध लढण्याची त्याची मानसिक तयारी होती. त्यानं १२ डावांचा हा सामना ६.५ – ५.५ असा जिंकून आपलं अजिंक्यपद कायम राखलं. रडीचा डाव खडी झाला होता.

आनंदविषयी सर्व जगभरात आदराची भावना आहे. त्यामुळे त्याच्यावर सन्मानाचा वर्षांव होत असतो. तुम्ही म्हणाल की, ५ वेळा जगज्जेता राहिलेल्या खेळाडूवर बुद्धिबळप्रेमी राष्ट्रांमधील लोक प्रेम नाही करणार तर कोण? परंतु ज्या देशात बुद्धिबळ फार खेळलं जात नाही तेथेही आनंदविषयी आदराची भावना आहे. जपानमधील खगोलशास्त्रज्ञ केन्झो सुझुकी यांनी एका नव्या छोट्या ग्रहाचा शोध लावला आणि त्याला २०१५ साली ‘विशीआनंद’ असं नाव दिलं. मी आनंदच्या हृदयेश पुरस्काराच्या वेळी त्याची ओळख करून देताना ही गोष्ट उघड केली त्या वेळी प्रेक्षकांनाच नव्हे तर मंचावर उपस्थित अमीर खानलाही धक्का बसला होता. त्यानं तिथेच आनंदला विचारलं, ‘‘हे खरं आहे का?’’ आनंदनं विनयपूर्वक होकार दिल्यावर अमीर खान त्याला म्हणाला, ‘‘तुझी कीर्ती आता अंतराळातही पोचली की!’’ ( यूटय़ूबवर टाइप करा Raghunandan Gokhale reminds us आणि हा प्रसंग आपल्याला बघता येईल.)

आनंद काही वर्षे युरोपमध्ये सतत स्पर्धा खेळत असल्यामुळे माद्रिद जवळ एका उपनगरात राहत होता. स्पेन सरकारनं त्याची दखल घेऊन आनंदचा एका खास पुरस्कारानं गौरव केला. हा पुरस्कार स्पेन आणि भारत या दोन्ही देशांना गौरव प्राप्त करून देणाऱ्या भारतीयाला दिला जातो. सोव्हियत संघराज्यानं १९८७ सालीच ‘सोव्हियत लँड नेहरू पुरस्कारा’नं आनंदचा गौरव केला होता. २०१४ साली आनंदला ‘रशियन ऑर्डर ऑफ फ्रेन्डशिप’ या खास पुरस्कारानं गौरविलं गेलं आणि तेही मॉस्कोमध्ये! हा पुरस्कार आर्थिक, सांस्कृतिक आणि विज्ञान या क्षेत्रातील व्यक्तींनाच त्यांच्या रशियाबरोबरचे स्नेहसंबंध वाढविण्यासाठी देण्यात येतो. हा पुरस्कार मिळवणारा आनंद हा एकमेव खेळाडू असावा. पण बुद्धिबळ खेळाडूला हा पुरस्कार मिळणं योग्य आहे. कारण बुद्धिबळ हा खेळ भारतीय संस्कृतीचं प्रतीक आणि विज्ञानाच्या जवळ जाणारा नाही का?

प्रख्यात रशियन बुद्धिबळ मासिक ‘64’ दरवर्षी त्या वर्षीची उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला एक पुरस्कार देतं. या पुरस्काराला बुद्धिबळाचं ऑस्कर म्हणतात. जगभरचे बुद्धिबळ पत्रकार/ लेखक त्यासाठी मतदान करतात. आनंदला हा पुरस्कार तब्बल ६ वेळा मिळालेला आहे. आनंदला ‘स्पोर्टस्टार’ मासिकानं गेल्या सहस्रकातला महान खेळाडू म्हणून सन्मानित केलं होतं. सामान्य क्रीडा रसिकांनी एखादेवेळेस एखाद्या क्रिकेटपटूची निवड केली असती, परंतु जगभर खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळात ५ वेळा जगज्जेतेपद मिळवणारा विश्वनाथन आनंद सुयोग्य असल्याची दाद ‘द हिंदू’ दैनिकाच्या प्रतिष्ठित निवड समितीनं दिली होती.

सतत युरोपमध्ये स्पर्धा खेळत असल्यामुळे आनंदनं माद्रिदमध्ये घर घेतल्याचा उल्लेख वर आला आहेच. त्यामुळे त्याला ८-८ तसांचा विमानाचा प्रवास करून चेन्नईहून युरोपात प्रवास करण्याची गरज उरली नाही. पण २०१० साली भारत सरकारच्या मानव संसाधन विभागाच्या गलथान कारभारामुळे उगाचच या विश्वविजेत्याला मनस्ताप झाला होता. हैद्राबाद विश्वविद्यालयानं आनंदचा डॉक्टरेट देऊन गौरव करण्याचं ठरवलं आणि नियमाप्रमाणे फाइल दिल्लीला पाठवली. पण दिल्लीत बसलेल्या बाबूंनी असं ठरवलं की, हा जास्त काळ स्पेनमध्ये राहतो म्हणजे त्यानं स्पेनचं नागरिकत्व घेतलं असावं. त्यांनी आनंदच्या नागरिकत्वावर शंका घेतली. आनंदला डॉक्टरेट देण्याचा समारंभ रद्द करण्यात आला. ही बातमी बाहेर येताच एकच गोंधळ उडाला आणि मानव संसाधन खात्याची पूर्ण बदनामी झाली. एका फोनवर जी गोष्ट आनंदकडून सहजरीत्या ताडून बघता येत होती किंवा पासपोर्ट ऑफिसकडून शहानिशा करून घेण्यात आली असती, त्यासाठी मंत्रालयानं अनेक आठवडे फाइल तशीच ठेवली. अखेर मानव संसाधन मंत्री कपिल सिब्बल यांनी आनंद हा भारतीय नागरिक असल्याचा जाहीर खुलासा केला आणि हैद्राबाद विश्वविद्यालयाला आनंदला नंतरच्या तारखेला डॉक्टरेट देण्यास सांगितलं. विश्वविद्यालयानं माफी मागितली, पण आनंदनं डॉक्टरेट स्वीकारण्यास नकार दिला. भारत सरकारनं त्याच वर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भोजनासाठी आनंदला आमंत्रित करून सरकारची अब्रू सावरण्याचा प्रयत्न केला. या भोजनासाठी आमंत्रितांमध्ये आनंद हा एकमेव खेळाडू होता.

असं म्हणतात की, आनंद आपल्या कुशाग्र बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा उपयोग करून शेअर बाजारातही भरपूर पैसे मिळवतो; किंबहुना अनेक रशियन ग्रॅण्डमास्टर्स आज न्यू यॉर्कमधील शेअर बाजारात काम करत आहेत. परंतु आनंदचं मोठेपण या गोष्टीत आहे की, आज तो आपल्या अकादमीतर्फे निवडक खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देतो. या अकादमीमध्ये प्रवेश फक्त निमंत्रितांनाच मिळतो. आनंदनं लिहिलेल्या त्याच्या चांगल्या डावांच्या पुस्तकाला ब्रिटिश बुद्धिबळ संघटनेचा मानाचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला आहे. पण माझ्या मते आनंदचा खरा मोठेपणा दिसतो तो त्यानं २०२० च्या ऑनलाइन ऑलिम्पियाडच्या वेळी स्वत:चं कर्णधारपद तरुण विदित गुजराथीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि स्वत: साधा खेळाडू म्हणून खेळला.

अशा या महान खेळाडूला भारत सरकारनं पद्मविभूषण देऊन त्याचा गौरव केला आहेच, पण आमच्यासारख्या बुद्धिबळ शौकिनांना अपेक्षा आहे त्याला भारतरत्न मिळण्याची. बघू या कधी सरकार हा निर्णय घेतं?

gokhale.chess@gmail.com