कोणतेही नियोजन नसताना शहरे वाढविली जात आहेत. त्यातून शहरे बकाल होत आहेत, मात्र त्याचे कुणालाही देणे-घेणे नाही. प्रस्थापितांच्या दुर्लक्षामुळे राज्याची ही अवस्था झाली आहे. एकदा माझ्या हातात सत्ता देऊन बघा, अनधिकृत बांधकामे करणाऱ्या बिल्डरांना खडी फोडायला पाठवितो, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. शहराचे नियोजन नसल्याने भविष्यात मोठा धोका आहे. त्यामुळे झपाटय़ाने वाढणाऱ्या शहरांतील इमारतींची बांधकामे पुढील दहा वर्षे थांबविली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे व शिरूरचे उमेदवार अशोक खांडेभराड यांच्या प्रचारार्थ राज यांनी रविवारी कोंढवा येथे सभा घेतली. त्यानंतर पायगुडे यांच्या प्रचारार्थ त्यांची दुसरी सभा येरवडा येथे झाली. या दोन्ही सभांमध्ये त्यांनी नियोजनाअभावी वाढणाऱ्या शहरातील प्रश्नांवर भाष्य केले. नियोजनाअभावी निर्माण झालेल्या प्रश्नांना प्रस्थापित मंडळी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आजवर डोक्यावर बसलेल्यांना घरी बसवा, असे आवाहनही त्यांनी केले.
कोणताही विचार न करता केवळ इमारती बांधल्या जात आहेत. कोणतेही नियोजन नसताना अशा प्रकारे शहरे उभी राहत असतील, तर पुढील पिढीसाठी ते धोकादायक आहे. त्यातून शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतात. शहरात काही मोकळ्या जागा आहेत की नाही, तेही माहीत नाही. शहराचा कोणताही आराखडा नाही अशी टीकाही केली.

राज ठाकरे यांची सभा सुरू असताना त्याच वेळी टी- २० विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू होता. या सामन्याचा फटका कोंढवा येथील सभेला बसला. सभा सुरू असताना अनेक खुच्र्या रिकाम्या होत्या.