राज्यात सत्तास्थापनेवरील पेच मिटल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण यावेळी ही भेट जाहीर होती. निमित्त होतं करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचं लग्न. सोलापूरमधील करमाळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस मंचावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. यावेळी त्यांच्यात बराच वेळ गप्पाही सुरु होत्या. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. पण अखेर अजित पवार यांनीच आपल्यात काय बोलणं झालं याबद्दल खुलासा केला आहे.

अजित पवार यांनी सांगितलं की, “संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारीच लावली असल्याने एकत्र बसलो होते. यावेळी मी त्यांना हवा पाण्याबद्दल विचारत चौकशी केली”. अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यांना भेटत असून यावेळी पत्रकारांनी त्यांना भेटीबद्दल विचारलं असता त्यांनी ही माहिती दिली.

अजित पवारांना यावेळी उपमुख्यमंत्री पदाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी मला उपमुख्यमंत्री करावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण ते ठरवण्याचा निर्णय हा त्या त्या पक्षप्रमुखांचा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळात खाते वाटपाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबद्दल मला विचारू नका असंही यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यासंबंधी मी बोलणार नाही असं सांगितलं.

अजित पवारच म्हणाले होते, मी काकांशी बोललोय; फडणवीसांचा खुलासा
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांबरोबर केलेल्या सत्तास्थापनेबाबत शनिवारी मोठा खुलासा केला. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महिनाभर झालेल्या सत्तानाट्यावर वक्तव्य केलं.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकार स्थापन केले होते. मात्र, अवघ्या ८० तासांमध्ये कोसळले. या निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर ते म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजपासोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितले आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावाही यावेळी त्यांनी केला आहे.