देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देश एका गंभीर संकटाचा सामना करत आहे. अशा गंभीर संकटावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. दिवे लावा, टाळ्या वाजवा असे आवाहन करण्याचे काम पंतप्रधानांचे नसून त्यांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा भाजपाला रोग लागल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर बोलताना थोरात म्हणाले की, “कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, मेडीकल स्टाफ, पोलीस यंत्रणेसह सर्वजण आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना आवश्यक असलेली मदत करणे ही आजची गरज आहे. जास्तीत जास्त प्रमाणात व्हेंटीलेटर उपलब्ध करणे, टेस्टींग लॅबची संख्या वाढवणे, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक असलेले कीट उपलब्ध करुन देणे तसेच राज्य सरकारना जास्तीत जास्त मदत करणे, नागरिकांना धीर देणे, त्यासाठी केंद्र सरकारकडून भरघोस आर्थिक मदतीबरोबर सर्वप्रकारचे सहाय्य देण्यास प्राधान्य देणे हे त्यांचे काम आहे.” “दिवे लावणे, टाळ्या वाजवणे असे इव्हेंट करणे नाही. हे सर्व पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यासारखे वागणार आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- “सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गए”

“राष्ट्रीय आपत्तीच्या काळात देशाला एका कणखर व जबाबदार नेतृत्वाची गरज असते दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या नेत्यांकडे ते नाही. कोणत्याही घटनेचा इव्हेंट करण्याचा एक रोगच त्यांना लागला आहे. याची देशाला मोठी किंमत मोजावी लागेल. कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीवेळीही इव्हेंट करुन परिस्थीतीचे गांभीर्य घालवले जात आहे,” असेही थोरात म्हणाले.