डोक्यावर कर्जाचा डोंगर त्यातच मुलाच्या लग्नाची तारीख जवळ आल्याने विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील कंदलगाव येथे घडली. रेवप्पा माळप्पा सलगरे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सलगरे यांची कंदलगाव-कोरवली महामार्गालगत ३ ते ४ एकर शेती आहे. दुष्काळामुळे शेतात पीक आले नाही. सलगरे यांनी याच शेतावर विविध कार्यकारी सोसायटीचे ४ लाख रुपये, लोकमंगल बँकेचे २ लाख रुपये व इतर पतसंस्थांचे कर्ज असे एकूण ७ ते ८ लाखांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी त्यांनी अर्ज केला होता. पण त्यांच्या अटीत न बसल्याने त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. या चिंतेत असतानाच मुलगा म्हाळाप्पा याच्या लग्नाची २५ मार्च तारीख जवळ आली होती. यामुळे खचलेल्या सलगरे यांनी अखेर मंगळवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा आणि विवाहित मुलगी आहे.