राज्यातील मान्सून जरी परतल्यात जमा असला तरी देखील कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला 'क्यार' या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसत आहे. आगामी दोन दिवसात 'क्यार' हे चक्रीवादळ कोकणासह गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. शिवाय या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांना व प्रशासनास सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत गुरूवारपासून मुसळधार पाऊस आहे. दमदार पावसामुळे या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचले असल्याने येथील जनजीवन काहीसे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. मध्यरात्रीपासून किनारपट्टीवर जोरादार वारा आणि पाऊस सुरू असून मालवण मधील देवबाग परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी शिरलं आहे. त्यात आता आगामी दोन दिवसात 'क्यार' चक्रीवादळ येऊन धडकणार असल्याने येथील सर्वांचाच जीव टांगणीला लागलेला आहे. तर, कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना कारण नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शिवाय, कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही काही दिवस कोकणात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.