केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत, त्यांनी नेहमी रोखठोक भूमिका मांडलेली आहे. आजच्या राजकीय घडामोडींसह राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य करताना म्हटले आहे की, आजच्या राजकीय नेत्यांना राजकारणाचा खरा अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकारणाचा अर्थ सत्ताकराण असाच गृहित धरला जात आहे. त्यामुळे लोक सत्तेच्या मागे धावत आहेत, ज्याप्रमाणे एखादे जहाज बुडताना सर्वात अगोदर त्यातील उंदीर बाहेर पडतात, त्याचप्रमाणे आज सत्ता बदलाबरोबर अनेकजण पक्ष बदलत असल्याचे म्हणत त्यांनी सध्या सुरू असलेल्या पक्षांतराबाबत टिप्पणी केली. त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, ही गोष्ट योग्य नाही अशी लोक कधीच इतिहास घडवू शकत नाहीत. नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. राजकीय नेत्यांनी सत्तेच्या मागे न धावता आपल्या वैचारिक भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे असा सल्ला देत, राजकारणात असताना विचारभिन्नता असणे स्वाभाविक आहे परंतु, आजच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या असल्याचेही ते म्हणाले. इतिहास हा परिश्रमाच्या घामांच्या धारांनी लिहिला जातो. राजकारणात यशस्वी व्हायच असेल तर शॉर्टकटच्या फंद्यात पडू नका, चौकटीबाहेर जाऊन विचार करा असेही ते म्हणाले.