राज्यात करोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानापर्यंत याची झळ पोहोचली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसंच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. आदित्य ठाकरे विलगीकरणात असून रश्मी ठाकरे यांना विलगीकरणात खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कामात व्यस्त असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या कार्याला सलाम केला आहे. ते म्हणाले आहेत की, "पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वत:च्या ह्रदयात अनेक स्टेन्स असतानादेखील ज्या पद्दतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!". भाजपा आमदार अतुल भातळखकरांकडून खुलासा करण्याची मागणी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. कार्यक्रम पत्रिकेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचंही नाव होतं. पण करोनाची लागण झाली असल्याने ते अनुपस्थित होते. दरम्यान घरात दोन करोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला अशी विचारणा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार नागरिकांमुळे करोनाचा धोका वाढत असल्याचं म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या वक्तव्यारुन मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं की, “मुंबईच्या महापौरांनी नागरिकांना बेजबाबदार ठरवण्यापेक्षा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा घरात दोन कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब सदस्य निघाले असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार कसा पडला याचा खुलासा करावा”.