राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पडळकरांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरुन भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. गोटे यांनी एक पत्रक जारी करुन भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा आमदार राम कदम यांच्यावर टीका केली आहे. या पत्रकामध्ये चंद्रकांत पाटील यांना भाजपाच्या एका नेत्यानेच ‘चंपा’ हे नाव ठेवल्याचा दावा गोटे यांनी केला आहे.

शरद पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत भाजपा नेत्यांच्या नावांसदर्भात गोटेंनी भाष्य केलं आहे. “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा यांना ‘चंपा’ म्हणतात याचे तीव्र दु:ख होत असल्याचे त्यांनी कुठलाही आड पदडा न ठेवता मोकळेपणे मांडले. चंद्रकांत दादांना हे माहित नसावे की त्यांचे ‘चंपा’ नावाचे बारसे स्वत: गिरीष महाजनांनी केलं. महाजनांच्या कार्यालयात बसलो असताना अरे त्या ‘चंपा’ला फोन लाव असे सांगितलं. भाजपामधील नेत्यांचे बारसे अन्य कुणे करायला पक्षातील नेत्यांनी संधीच शिल्लक ठेवली नाही. एकमेकांमधील द्वेष आणि स्पर्धा इतकी टोकाला गेली होती की त्यांनीच एकमेकांचे नामकरण करुन गुपचूप बारसे साजरे केले,” असा टोला गोटे यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> “…आणि फडणवीस यांचे टरबुज्या नाव सर्वश्रुत झालं”

राम कदम यांना इशारा

माझ्या नादी लागू नका असा इशारा गोटे यांनी राम कदम यांना दिला आहे. “भाजपचे प्रवक्ते राम कदम प्रसार माध्यमांसमोर बोलतांना ‘अनिल गोटे यांचे वय झाले’ असे म्हणाले. माझ्या वयाची त्यांना नेमकी काय अडचण निर्माण झाली हे मला समजले नाही. वयाचा आणि वक्तव्याचा नेमका संबंध आला कुठे? नाथाभाऊंच्या प्रकृती बद्दल पक्षातील विरोधकांकडून अशीच वक्तव्ये केली जात होती. राम कदमांना ऐवढेच सांगतो की, समुद्र किनारी जावून तोकड्या चड्ड्यांमध्ये फोटो सेशन केले. राहुल महाजनच्या समवेत महिलेशी केलेल्या वर्तनावर वयाचे मुल्यमापन करायचे का? माझ्याबद्दल जेवढे वैयक्तीक बोलाल तेवढेच मी तुम्हाला समजणाऱ्या भाषेत उत्तर देईन ! माझ्या नादी लागू नका,” असं गोटेंनी म्हटलं आहे.

त्यांना ‘महारोगी’ असे म्हणालो नाही

फडणवीस यांना आपण महारोगी म्हणालो नाही याचं भाजपाच्या नेत्यांनी भान ठेवावं असंही गोटे यांनी पत्रात नमूद केलं आहे. “देवेंद्र फडणवीसांना मी महारोग म्हणालो नाही. संतापाच्या भरात वगैरे काही बोललो नाही. उलटपक्षी माझ्या मनात उसळलेल्या संतापाच्या ज्वालामुखीची आग बाहेर पडू नये म्हणून संयमी वक्तव्य केले. पत्रकात प्रसिध्दी माध्यमांशी जे बोललो तेच माझ्या पत्रकात आहे. शांत डोक्याने संतापावर नियंत्रण ठेवून लिहले आहे. फडणवीसांना महारोगाची उपमा दिली. ‘महारोगी’ असे म्हणालो नाही. याचे भान भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठेवावे,” असंही गोटे यांनी पत्रात म्हटलं आहे.