कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था राम कदम यांची झालेली दिसते अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी भाजपा नेते आमदार राम कदम यांच्यावर केली आहे. आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्ये करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत असा टोलाही आमदार नवाब मलिक यांनी लगावला आहे.

विकासविरोधी सरकारच्या कामाची अजब पद्धत, हिवाळी अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारण्यावर प्रतिबंध. प्रश्नोत्तराचा तास होणार नाही. सरकारने आमदारांना प्रश्न दाखल करण्यापासून रोखले, असे म्हणत भाजपाचे आमदार राम कदम यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) ३० दिवस आधी देणे अपेक्षित असते. सदनात लक्षवेधीद्वारे प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात असे देखील नवाब मलिक यांनी म्हटले आहे. कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे असे देखील नवाब मलिक यांनी राम कदम यांना उद्देशुन म्हटले आहे.