६५ वर्षावरील ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना उतारवयात मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी येथे केली. राज्य शासनाच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्यांनी महिलांच्या हिताच्या घोषणांची खैरात केली.

मुश्रीफ म्हणाले, “६५ वर्षांवरील ज्येष्ठांचा मदतनिधी मासिक एक हजार रुपयांवरुन दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. मागील पाच वर्षांत बंद झालेल्या निराधार योजनेची पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरुन ५० हजार रुपये करण्यात येईल. महापूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शासकीय रिक्त जागेची मेगा भरती सुरु होणार असून महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे,” अशा घोषणा करून त्यांनी महिलांना महिला दिनाची भेट दिली.

महिलाराजचे कौतुक
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, “महापालिका, जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज आहे. बचत गटाच्या अध्यक्ष ही नवी ओळख पुढे आली आहे. जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिलांचे योगदान आहे. लवकरच आम्ही दुधाला चांगला भाव देणार आहोत.”

मंत्र्यातील कवयित्री प्रकटली
महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काव्य वाचनातून स्त्री मनाचा हुंकार व्यक्त केला. ‘इतुके दिवस बोललो ओठातल्या ओठात आम्ही, आता कोठे बोलावयाची खरी सुरुवात केली… तू रोज एक नेम कर… स्वत:वर तू प्रेम कर..’ या काव्यपंक्तीतून ठाकूर यांनी महिलांना संदेश दिला. तसेच, दोन्ही कुटुंबांची, घराण्यांची नावे आणि जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेला आरक्षण द्या अगर न द्या, सन्मान मात्र जरुर द्या अशी भावनाही व्यक्त केली.