अशोक तुपे

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला नगर जिल्ह्य़ात एकही जागा मिळाली नाही. माजी आमदार व निष्ठावंत शिवसैनिक अनिल राठोड यांच्या निधनाने शिवसेनेत पोकळी निर्माण झाली. त्या पार्श्वभूमीवर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना शिवबंधन बांधण्यात आले. जिल्ह्य़ाच्या राजकारणात नव्या नेतृत्वाला आणून भारतीय जनता पक्षालाही धक्का तर दिलाच तसेच पक्ष संघटना सावरण्यासाठी शिवसेनेने रणनीती आखली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शंकरराव गडाख यांनी सर्वात प्रथम शिवसेनेला पाठिंबा दिला. ते सेनेचे सहयोगी सदस्य झाले. अन्य पक्षांनीही त्यांचा पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न चालविले होते. मात्र गडाख हे ठाम राहिले. त्यामुळे सरकार बनविल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. जलसंधारण हे महत्त्वाचे खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांचा शिवसेना प्रवेश ही केवळ औपचारिकता होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नेवासे येथे पक्षप्रवेशाचा सोहळा होणार होता. परंतु करोनामुळे हा सोहळा लांबणीवर पडला. पण आता त्यांच्या हातात शिवबंधन बांधण्यात आले आहे. सहकारातील एक प्रभावशाली कुटुंबातील शेतकरी व मराठा नेता असलेला चेहरा सेनेला मिळाला आहे. जिल्ह्य़ात सेनेची राजकीय ताकद निर्माण करता येणार आहे.

एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेले माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी सोनईला साखर कारखान्याची उभारणी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तीन वेळा खासदार, दोनदा आमदार असलेले गडाख हे यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य, पुरोगामी विचाराचे नेते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पाठराखण केल्याने त्यांना नगरच्या राजकारणात त्रास झाला. त्यामुळे सत्तेपासून दूर राहावे लागले. असे असले तरी आबासाहेब निंबाळकर, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात, माजी आमदार शंकरराव काळे, मारुतराव घुले, माजी मंत्री  गोविंदराव आदिक या दिवंगत नेत्यांबरोबरच त्यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार शिवाजी नागवडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी आमदार आप्पासाहेब राजळे आदी अनेक नेत्यांबरोबर सहमतीचे राजकारण केले. जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच होता. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे त्यांचे चिरंजीव, पक्षातीलच काही लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांना पाडले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला अन् अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी त्यांची मैत्री आहे. त्यांच्या आग्रहानेच त्यांनी सेनेला पाठिंबा दिला.  तो निर्णय त्यांना फायदेशीर ठरला.

गेल्या विधानसभेत जिल्ह्य़ात शिवसेनेचे तीन आमदार होते, पण विधानसभा निवडणुकीत ही संख्या शून्यावर आली. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, अनिल राठोड यांचा पराभव झाला. माजी आमदार अशोक काळे, प्राजक्त तनपुरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. ते राष्ट्रवादीत गेले. निवडणुकीनंतर जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात सेनेत धुसफूस सुरू होती. पारनेरला माजी आमदार औटी यांच्या विरोधात नगरसेवकांनी बंड केले. त्यांची घरवापसी सेनेने करून घेतली.

सहकाराच्या राजकारणाला महत्त्व

नगरच्या राजकारणावर सहकारातील नेत्यांची पकड आहे. हे नेते राष्ट्रवादी, काँग्रेस व भारतीय जनता पक्षात विभागलेले आहेत. शिवसेनेचे तेथे अस्तित्व नव्हते. आता गडाख यांच्यामुळे ते निर्माण झाले आहे. नगर जिल्हा बँक, जिल्हा परिषद, विधान परिषद व अन्य संस्थांच्या निवडणुकीत सेनेची दखल घेणे भाग पडणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोध असूनही विजयी झालेले सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांची गडाख यांना साथ असणार आहे.

नगर जिल्ह्य़ात शिवसेनेने बाळासाहेब विखे यांना केंद्रात तर राधाकृष्ण विखे राज्यात, अनिल राठोड यांना मंत्रिपद तर माजी आमदार विजय औटी यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. सेनेत अनेक नेते आले अन् पक्षातून गेले. शिवसैनिकांना आदेश चालतो. त्यामुळे केवळ त्यांना उभारी देण्याचे काम गडाख यांना करावे लागेल.

गडाख व त्यांचे बंधू प्रशांत गडाख यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्य़ात संपर्क वाढविला आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवारी करावी म्हणून भाजपचे प्रयत्न होते. त्या पार्श्वभूमीवर गडाख यांचा सेनाप्रवेश हा अन्य पक्षासाठी डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.

शंकरराव गडाख यांच्या प्रवेशामुळे शिवसेना मजबूत होण्यास मदत होईल. माजी आमदार अनिल राठोड यांच्या निधनाने पोकळी तयार झाली होती. ती भरून निघेल.

– शशिकांत गाडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना, नगर दक्षिण

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेला सर्वात आधी पाठिंबा दिला. सरकार  स्थापनेनंतर त्यांनी न मागता मंत्रिपद दिले. शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पूर्वीच झाला होता.  आता पक्षाने टाकलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू.

– शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री