लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उस्मानबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारासमोर शुक्रवारी रात्री उशिरा भाविकांत झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका साठ वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य १९ भाविक जखमी झाले. मंदिराचे मुख्य द्वार उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांच्या प्रचंड गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश आणि पोलिसांनी केलेला लाठीमार यांमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास शनिवारी घटस्थापनेने सुरुवात होण्याची संपूर्ण तयारी झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या या घटनेने हा दावा फोल ठरवला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत मोठय़ा संख्येने भाविक दरवाज्यासमोरील मोकळ्या जागेत बसले होते. याच वेळी अचानक गर्दी वाढली व खाली बसलेल्या लोकांवर गर्दीचा लोट कोसळला. या वेळी चेंगराचेंगरीत सुमारे १०० ते १५० लोक अडकले. त्यातच गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली. या चेंगराचेंगरीतच सोलापूर जिल्ह्य़ातील हरिदास दिनू खपाले (वय ६०, दस्तुर, तालुका माळशिरस) यांचा मृत्यू झाला. शिवाय १९ भाविक जखमी झाले.कोणाच्या आदेशांनी दारे बंद?या घटनेनंतर पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी अधिकारी व पोलीस प्रशासनाची बैठक घेतली. दरवाजा बंद केल्याने दुर्घटना घडल्याचा दावा पोलीस व पालकमंत्री यांनी केला. तसेच सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून या बाबत जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत देण्यात आले. दरवाजा बंद करण्याचा आदेश कोणी दिला, दरवाज्याला कुलूप लावले होते का, दरवाज्याची किल्ली कोणाकडे असते, दरवाजा लावण्याची गरज होती का, याचा शोध सुरू आहे.