महाराष्ट्र सदनात घडलेली घटना उपाहारगृहातील असुविधांबद्दलचा असंतोष होता. विरोधकांनी त्यास धार्मिक वळण देऊन हीन दर्जाचे राजकारण केले. मराठी कलाकार व लोकप्रतिनिधींना त्याचा उपयोग होणार नसेल तर महाराष्ट्र सदनाचे हॉटेल करून ते सर्वाना खुले करावे, असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना खासदारांच्या कृतीवर गहजब केला जात असताना दुसरीकडे याच काळात सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय सैनिकांवर गोळीबार होत असून त्याबद्दल कोणी काही बोलत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.