राज्यातील दुष्काळी गावांच्या यादीत शनिवारी १४२० गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. ही सर्व गावे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. याशिवाय, पुढील आठ दिवसांत केंद्रीय पथकाकडून पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र सरकारच्या सुधारित नियमानुसार अपुऱ्या पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर या सर्व गावांमध्ये दुष्काळासाठीच्या उपाययोजना आणि सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसूलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स सुरू करणे तसेच आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडीत न करणे अशा निर्णयांचा समावेश आहे.