वेदान्त समूह आणि फॉक्सकॉनच्या भागीदारीतून महाराष्ट्रात १ लाख ६६ हजार रुपयांची गुंतवणूक होणार होती. पण, आता या गुंतवणूकीसाठी गुजरातची निवड केल्याचं वेदान्त समूहाने जाहीर केलं आहे. त्यामुळे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार आणि कोट्यावधी रुपयांच्या महसूलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. आता याच मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वेदान्ता प्रकल्प गुजरातनं (Gujarat) पळवला, यासाठी शिंदे, फडणवीस सरकार जबाबदार आहे. मात्र, या प्रकल्पाचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडण्यात येत असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. संजय शिरसाट यांना दानवेंचा टोला शिंदे गटाकडून उपनेत्यांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये २६ जणांची नावे आहेत. मात्र, औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना उपनेत्यांच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यावरून दानवे यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे, शिरसाट हे उपनेत्यांपेक्षा मोठे नेते असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवारांचा इशारा “देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २ लाख कोटींची गुंतवणूक आणि २ लाख रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, तुमचे केंद्र सरकारसह चांगले संबंध आहे. तुमच्या कार्यकाळात हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वेदान्त प्रकल्प राज्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले. वेदान्तने कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्राला निवडलं होते. मात्र, आता गुजरातचे नाव समोर येत आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प दुर्लक्षामुळे बाहेर जात असेल, तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.