“बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो”; असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले. या कार्यक्रमात त्यांनी ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघाताचा प्रसंग सांगितला. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची रुग्णवाहिका वेळेवर आली नसती तर माझी प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असं अमिताभ बच्चन म्हणाले.

बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ यांनी १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमातील अपघातानंतरचा किस्सा सांगितला. जुलै १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटातील एका साहस दृश्याच्या चित्रिकरणादरम्यान अमिताभ यांना गंभीर दुखापत झाली होती. सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरुमध्ये उपचार सुरू होते. पण, प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुगालयात हलवण्यात आलं होतं. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल बोलताना बच्चन म्हणाले, “अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. ‘कुली’च्या शुटिंगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. सेटवर अपघात झाल्यानंतर माझ्यावर बंगळुरुमध्ये उपचार सुरु होते. मात्र प्रकृती नाजूक झाल्यानंतर मुंबईमध्ये उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मला बंगळुरुहून विमानानं मला मुंबईला आणलं होतं. पुढील उपचारासाठी मला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणायचं ठरलं. मी बेशुद्ध अवस्थेत होतो. ते पावसाचे दिवस होते. मला घेऊन विमान मुंबईत दाखल झाले तेव्हा मुसळधार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन मला थेट ब्रीच कँडी रुग्णालयात नेलं जाणार होतं. मुसळधार पावसामुळे एकही रुग्णवाहिका मला नेण्यासाठी उपलब्ध नव्हती. त्यावेळी शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कँडीला पोहोचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती. जेव्हा मला सर्वाधिक गरज होती तेव्हा बाळासाहेबांनी मला मदत केली. त्यांनी मदत केली नसती तर मी कदाचित आज जिवंत नसतो”, असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांचे आभार मानले.

माझे आणि बाळासाहेबांचे कायमच जिव्हाळ्याचे संबंध होते असं सांगतानाच आम्ही एककमेकांचा आदर करायचो असं अमिताभ म्हणाले. तसेच बाळासाहेब जयावर त्यांच्या लेकीप्रमाणे प्रेम करायचे असंही अमिताभ यांनी सांगितले.