देशाचे पुढील पंतप्रधान राहुल गांधी होवो अथवा नरेंद्र मोदी, जो कोणी या पदावर असेल त्यांच्याकडून देशासाठी लाखो लोकांनी दिलेल्या बलिदानाची जाण ठेवली गेली पाहीजे. परंतु सर्वजण केवळ सत्ता आणि पैशांच्या मागे लागले असून त्यामुळेच आज या देशाची दुरवस्था झाली आहे. कुठलाही पक्ष देशाला भवितव्य देणार नसून केवळ जनआंदोलनच ते देऊ शकते,  असा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना केला. पंतप्रधानाने आपल्या पदाप्रमाणे व्यवहार केला पाहिजे दुखी पीडितांचा विचार केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान आम्ही अण्णांचा गरसमज करून देत नसल्याचा खुलासा माजी सनदी अधिकारी किरण बेदी यांनी यावेळी केला.
काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत असल्याबददल हजारे यांना विचारले असता हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. जनलोकपालमध्ये न्यायव्यवस्थेचा समावेश नसल्याबददलच्या प्रश्नाला उत्तर देताना हजारे म्हणाले, न्यायव्यवस्थेसंदर्भात सरकारने संसदेत स्वतंत्र विधेयक मांडले असून कोणत्याही मार्गाने समाज व देशाचे  हित झाले पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. मग त्याचा समावेश जनलोकपाल मध्ये आहे की स्वतंत्र कायदयात त्यास महत्व नाही. यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, आता सर्व पक्षांनी जनलोकपालास पाठिंबा दिला असून देशातील जनतेने आता या विधेयकाविषयी कोणत्याही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही, हे विधेयक मंजूर होणे एवढीच आता अपेक्षा आहे.
दिल्लीतील सामूहिक बलात्काराला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्याविषयी बोलताना अण्णा म्हणाले, युवकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत, परस्त्री ही आपली आई किंवा बहीण आहे या नात्याने त्यांच्याकडे बघितले तरच हा प्रश्न सुटेल