औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील एमआयएम पक्ष संघटनेत फूट पडताना दिसत आहे. निवडणुकीतील तिकीट वाटपाच्या मुद्द्यावरून येथील पक्ष संघटनेत सध्या दोन तट पडल्याचे चित्र आहे. याच वादामुळे औरंगाबदमधील पक्षाचे एकमेव आमदार इम्तियाज जलील यांनी तिकीटवाटप समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम आठ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मुस्लिमबहुल लोकसंख्या असलेल्या या भागांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी पक्षातील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळेच नक्की कोणाला तिकीट द्यायचे, यावरून पक्षांतर्गत नवे वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळेच वाद टाळण्याच्यादृष्टीने इम्तियाज जलील यांनी तिकीटवाटप समितीतून राजीनामा दिल्याचे समजते. मात्र, मी कोणत्याही कारणाने नाराज नसून मुंबईच्या वांद्रे येथील पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी जात असल्याचे स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी दिले.