डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com ज्या कंपन्या विशेषत: उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्या सामानाच्या वर्गीकरणाचे सूत्र अवलंबतात. मोठय़ा कंपन्यांमध्ये कच्च्या किंवा पक्क्या मालामध्ये नियंत्रण ठेवणे फार गरजेचे असते. यामागे चोरीला पायबंद हे कारण तर आहेच, पण योग्य माहिती, पुढील अंदाज, मालाचा साठवणुकीचा खर्च, संसाधनाचे धोरणात्मक वाटप वगैरेदेखील निर्धारित केले जाते. ही सूत्रे मुख्यत्वे करून ‘पारितो विश्लेषण’ या सिद्धांतावर अवलंबून आहेत. फार किचकट नाहीत पण समजून घ्यायला हवी. म्हणजे ज्या वस्तू जास्त किमतीच्या त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे, पण कमी किमतीच्या वस्तूंवर कमी नियंत्रण ठेवले तरी चालते. ऐंशी टक्के किमतीच्या वस्तू सुमारे वीस टक्के अशा प्रमाणात किंवा संख्येने असतात. त्यामुळे कंपन्या मोठय़ा किमतीच्या वस्तूवर जास्त लक्ष ठेवून असतात. जसे मोठय़ा अभियांत्रिकी व्यवसायामध्ये लहान-मोठे खिळे तर हवे तेवढे मिळतात किंवा विना-नियंत्रणाचे असतात, पण मोठी यंत्रे किंवा सुट्टे भाग मात्र विचार करून खरेदी केले जातात आणि त्यावर पूर्ण नियंत्रण असते. बऱ्याचशा कारखान्यांमध्ये वस्तूंवर नियंत्रण असते, पण काही गोष्टी जसे पुट्ठे, कागद किंवा इतर सामान इकडेतिकडे पडलेलेदेखील दिसते म्हणजे नियंत्रण फारच कमी. थोडक्यात काय तर मालाचे वर्गीकरण अ, ब किंवा क अशा श्रेणींमध्ये करणे आणि अ वस्तूंना अधिक नियंत्रण, ब वस्तूंना थोडेसे कमी नियंत्रण आणि क वस्तूंना किमान नियंत्रण. घरातदेखील असेच नियंत्रण असते. जसे सोने चांदी किंवा महत्त्वाची कागदपत्रे (अ वर्गीकरण) कपाटात लॉकरमध्ये ठेवतात. अगदी जास्तीच्या नियंत्रणासाठी बँकासुद्धा लॉकर उपलब्ध करून देतात. पण इतर काही वस्तू जसे पेपर, पुस्तके, पेन, फुलदाणी ही घराच्या दिवाणखान्यात ठेवली जातात. म्हणजे यावर नियंत्रण कमी असते आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याची किंमत. घरातील पेन, पेपर, पेन्सिल (क वर्गीकरण) किती आहेत याची मोजदाद ठेवली जात नाही. पण सोन्या-चांदीच्या वस्तू, समभाग (आता ते डिजिटल स्वरूपात येतात) इत्यादी नक्की वारंवार तपासलेसुद्धा जातात. आता हे वर्गीकरण करायला आपल्याला फार काही विश्लेषण वगैरे करावे लागत नाही. ते आपोआपच आपल्याला कळते. गृहिणीदेखील भरजरी साडय़ा अ श्रेणीमध्ये ठेवतात तर जरा नेहमीच्या ब श्रेणीमध्ये असतात. परदेशातून वगैरे आलेली गोळय़ा चॉकलेट बिस्कीट अ श्रेणीमध्ये येतात. म्हणजे ती ‘कुणी खाल्ली’ असा प्रश्न येतो. पण प्रवासाला जाऊन न संपलेली गोळय़ा बिस्कीट क श्रेणीमध्ये जातात, म्हणजे ‘संपवा एकदा’! मानवी भावनासुद्धा यात समाविष्ट असतात. जसे एखाद्याने दिलेली एखादी वस्तू वगैरे आठवण म्हणून अतिशय काळजीपूर्वक अ किंवा ब श्रेणीमध्ये ठेवली जाते. मालाचे वर्गीकरण अ, ब किंवा क अशा श्रेणींमध्ये करतात. अ वस्तूंना अधिक नियंत्रण, ब वस्तूंना थोडेसे कमी नियंत्रण आणि क वस्तूंना किमान नियंत्रण. अ - सोने चांदी किंवा महत्त्वाची कागदपत्रे (अ वर्गीकरण) कपाटात लॉकरमध्ये ठेवतात. अगदी जास्तीच्या नियंत्रणासाठी बँकासुद्धा लॉकर उपलब्ध करून देतात. ब-आता हे वर्गीकरण करायला आपल्याला फार काही विश्लेषण वगैरे करावे लागत नाही. ते आपोआपच आपल्याला कळते. गृहिणीदेखील भरजरी साडय़ा अ किंवा थोडय़ा हलक्या साडय़ा ब श्रेणीमध्ये ठेवतात. क- पेपर, पुस्तके, पेन, फुलदाणी ही घराच्या दिवाणखान्यात ठेवली जातात. म्हणजे यावर नियंत्रण कमी असते आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे याची किंमत. घरातील पेन, पेपर, पेन्सिल (क वर्गीकरण) किती आहेत याची मोजदाद ठेवली जात नाही. लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /