"भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा आणि आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करू नये, अन्यथा पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रे तैनात करू शकतो", असे विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते ओडिसातील फुलबनी येथे एका सभेला संबोधित करत होते. पोखरण चाचणीच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले. "अटल बिहारी वाजपेयी यांनी २६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी (११ मे) पोखरण येथे अणुचाचणी केली होती. या चाचणीनंतर जगभरातील भारतीयांची मान उंचावली होती", असं मोदी म्हणाले. "तो काळ होता जेव्हा भारताने जगाला आपली ताकद दाखवली होती. दुसरीकडे काँग्रेसची मानसिकता देशाला घाबरवण्याची होती. ते म्हणाले 'सावध राहा… पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे… हे मरून पडलेले लोक, देशाची मानसिकताही मारण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसची नेहमीच अशी मानसिकता आहे", असे मोदी म्हणाले. हेही वाचा >> “पाकिस्तानचा आदर करा, नाहीतर ते अणुबाँब…”, काँग्रेस नेत्याच्या विधानामुळं खळबळ “आज पाकिस्तानची अवस्था अशी आहे की ते बॉम्ब (अण्वस्त्र) हाताळूही शकत नाहीत. अणूबॉम्ब आता ते विकायला निघाले आहेत. परंतु, लोकांना माहित आहे की ते अणुबॉम्ब चांगल्या दर्जाचे नाहीत. म्हणून, ते विकलेही जात नाहीत”, असं मोदी म्हणाले. राहुल गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले की, “राहुल गांधी दररोज वक्तव्ये करत आहेत. तुम्ही २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीतील त्यांचे भाषण पहा. ते त्याच स्क्रिप्ट वाचतात. विरोधी पक्ष होण्यासाठी काँग्रेसला लोकसभेच्या एकूण जागांपैकी एक दशांश जागा आवश्यक आहेत. देशाने ठरवले आहे की काँग्रेस विरोधी पक्षही राहणार नाही. कारण त्यांची संख्या ५० च्या खाली जाईल. तुम्हाला ते ४ जूनला दिसेल”, मोदी म्हणाले. दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या बाबतीत काँग्रेसची मानसिकता कमकुवत असल्याचा आरोप करून मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांना धडा शिकवण्याऐवजी हे लोक (काँग्रेस) दहशतवादी संघटनांच्या बैठका घेत आहेत. “मुंबईच्या २६/११च्या घटनेनंतर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत या लोकांमध्ये नव्हती. का? कारण काँग्रेस आणि इंडिया आघाडीने विचार केला की जर ते त्यांच्यावर कठोर कारवाई केली तर, त्यांची व्होट बँक कमी होईल”, असंही मोदी म्हणाले. मणिशंकर अय्यर काय म्हणाले? “पाकिस्तानकडे अणुबाँब आहे. आपल्याकडेही अण्वस्त्र आहेत. पण जर एखाद्या वेड्याने लाहोरवर अणुबाँब टाकण्याचा विचार केला तर त्याचे किरणोत्सर्ग अमृतसरपर्यंत पोहोचायला ८ सेकंदही लागणार नाहीत”, असा इशारा मणिशंकर अय्यर यांनी दिला होता. आपण जर पाकिस्तानचा आदर राखला तर तेही शांतता राखतील. पण आपण त्यांना डिवचले आणि एखाद्या माथेफिरूने आपल्यावर अणुबाँब टाकला तर काय होईल? असाही प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.