गुजरातमधील कोळ्यांनी नांगरलेल्या बोटींचे दोर कापले; गोळीबाराचीही धमकी

पालघर/ कासा : गुजरात राज्यातील पोरबंदर, ओखा, वेरावळ इत्यादी भागांमध्ये खलाशी म्हणून काम करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील नागरिकांना गुजरातच्या नारगोळ बंदरात उतरून दिल्याने जिल्ह्यातील खलाशी समुदायांमध्ये तसेच राज्याच्या सीमा भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुजरात राज्यातील नागरिकांना आपल्या भागातील बाजारपेठेमध्ये येऊ  न देण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा प्रशासनाने राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना अडलेल्या खालशांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

गुजरातच्या वेरावळ भागत कार्यरत असणारे सुमारे दोन हजार खलाशी ४ एप्रिल रोजी आपल्या घरी परतण्यासाठी गुजरात भागात आले होते. या खलाशांना प्रथम गुजरातमधील स्थानिकांनी उतरण्यास मज्जाव केला, नंतर ५ एप्रिल रोजी गुजरातचे रहिवासी असलेल्या ११२५ खलाशांना किनाऱ्यावर उतरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रामधील खलाशांना उतरवण्यास गुजरात प्रशासकीय विभागाने नकार दिला. पुढे रात्रीच्या वेळी बंदरांमध्ये नांगरलेल्या बोटींचे दोर कापून तसेच गोळीबार करण्याची धमकावणी दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातील ८०० खलाशी असणाऱ्या बोटीना नाइलाजाने वेरावळ येथे परतावे लागले.

या खलाशांनी आपल्या नातेवाईकांना पाठवलेल्या व्हिडीओमध्ये वेरावळमध्ये आपली व्यवस्थित सोय होत नसल्याची तक्रार नोंदवली आहे. वेरावळ येथेदेखील गुजरात राज्यातील खलाशांना उतरण्यास परवानगी असून इतर राज्यातील किमान २०-२५ हजार खलाशी मासेमारी बोटींमध्येच राहत असल्याचे अडलेल्या खलाशांचे नातेवाईक सांगत आहेत. संचारबंदी उठल्यानंतर किंवा ती लांबल्यास आम्ही रीतसर परवानगी घेऊन येऊ असे खलाशांनी कळविले आहे.

तलासरी येथील मधुकर राजद यांची चार मुले खलाशी म्हणून वेरावळ येथे असून त्या सर्वाचे जेवणा-खाण्याचे हाल होत असल्याचे त्यांनी मोबाइलवरून कळवले आहे. मासेमारी बोटीवर राज्यातील किमान तीन ते चार हजार खलाशी अडकून पडले असून त्यांना पिण्यासाठी पाणीदेखील व्यवस्थित मिळत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या खलाशांना मोबाईलचा देखील चोरून वापर करावा लागत असल्याचे सांगितले जात असून अशा अमानुष वागणुकीमुळे तलासरी व डहाणू भागातील अडकलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नारगोळ बंदरापासून आपले गाव अवघे दोन-तीन किलोमीटरवर असताना आपल्याला तेथे उतरू न दिल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे गुजरात सरकारने राज्यातील खलाशांशी दुजाभावाने वागविण्यात आले आहे.

नेत्यांकडून प्रयत्न

राज्यातील अडलेल्या खलाशांची काळजी घेण्यात यावी या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन सचिवांना पत्र लिहिले असून मच्छीमार नेते नरेंद्र पाटील, राजन मेहेर, ज्योती मेहेर आदी मंडळी गुजरातमधील मच्छीमार नेत्यांच्या संपर्कात आहेत.