मराठा आरक्षणामुळं रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कराड येथील प्रीती संगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, अकरावीच्या प्रवेशाबाबत लवकरच अध्यादेश काढला जाईल. या सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ९ सप्टेंबर पूर्वी जे प्रवेश झाले आहेत ते एसईबीसीच्या पद्धतीने होतील. मात्र, त्यानंतरच्या प्रवेशांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाशी, अॅडव्होकेट जनरलशी तसेच अॅड. थोरातांशी चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच सरकारचा निर्णय अध्यादेशाच्या स्वरुपात पहायला मिळेल.

आणखी वाचा- कार्यकर्ते, आमदारांमध्ये चलबिचल नको म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय – अजित पवार

दरम्यान, मराठा आरक्षणामुळं अकरावी तसेच आयटीआय असे अनेक शैक्षणिक प्रवेश अद्यापही रखडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार? असा सवाल विचारला जात आहे. यापार्श्वभूमीवर याबाबत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता खुल्या गटातून त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते आणि त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते, त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच हे सर्व प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेनुसार असणार आहेत.