महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे आंदोलन दहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. तीन मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनावर राज्यभर सुरू असलेले हे आंदोलन स्थगित करण्यात आल्यचे जिल्हाध्यक्ष गोडसे यांनी सांगितले. सातारा पंचायत समितीच्या प्रांगणात हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा होता. ग्रामपंचायतीच्या कामाची मोजमापे शाखा अभियंत्यांकडून घ्यावीत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी, ‘नरेगा’साठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढ द्यावी, ग्रामसेवकांच्या पडणारा कामाचा ताण कमी करावा यासह विविध मागण्या त्यांनी केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीमुळे आता मागण्या तातडीने मान्य होणार नाहीत हे समजल्यावर संघटनेने आचार संहिता संपल्यावर मागण्या मान्य होतील या आश्वासनावर आंदोलन स्थगित केले. सुमारे दीडशे ग्रामसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते.