प्रदीप नणंदकर, लोकसत्ता लातूर : लातूरने विविध पॅटर्न राज्याला आजवर दिले आहेत. सहकार, शेती अशा विविध विषयांमध्ये लातूरचं नाव मानाने घेतलं जातं. नव्याने रस्त्यावरील वाया जाणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा यशस्वी प्रयोग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आला असून या उपक्रमाचे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केले आहे . डॉ. सलीम शेख यांचा पाणी हा अभ्यासाचा विषय मुंबई येथील आयआयटीमधून त्यांनी एमटेकचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचा पाणी अभ्यासाचा विषय असल्यामुळे तोच एक त्यांचा ध्यास आहे. आपल्याकडील रस्ते खराब होण्याचे प्रमुख कारण हे रस्त्यावरील पाणी. जवळपास ५० टक्के जबाबदारी रस्ते खराब होण्यात पाण्याची असते .रस्त्यावरील पाणी रस्त्यावर न थांबता ते वाहून गेले तर रस्ते खराब होणार नाहीत, शिवाय जमिनीतील पाणी पातळी वाढेल व आजूबाजूच्या विंधन विहिरी व विहिरीची ही पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. या विषयात डॉक्टर सलीम शेख यांनी गेल्या चार वर्षांपासून संशोधन केले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना नुकतीच या विषयातील डॉक्टरेट पदवीही बहाल केली आहे. डॉक्टर सलीम शेख हे रत्नागिरी येथे अधीक्षक अभियंता पदावर कार्यरत असताना मुंबई गोवा मार्गावरील रस्ते खराब होण्याची कारणे यासंबंधी त्यांनी सर्वेक्षण केले होते व त्यात त्यांनी माहिती गोळा केली होती व तसा अहवालही विभागाकडे कळवला होता. मात्र ते केवळ कागदावर होते. त्याची अंमलबजावणी कुठेतरी होणे आवश्यक होते . लातूर येथील अधीक्षक अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर पाण्याच्या दुर्भिक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूरमध्ये आपल्याला पथदर्शी प्रकल्प अमलात आणता येईल असे त्यांच्या मनात आले. जिल्हाधिकाऱ्यांपुढे प्रकल्पाची कल्पना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी .पी. यांच्यासमोर त्यांनी कल्पना मांडली व लातूर तालुक्यातील गंगापूर ते पेठ या मार्गावरील नऊ किलोमीटरवर हा प्रयोग केला .रस्त्याच्या दुतर्फा ३०० मीटर अंतरावर त्यांनी एकूण सत्तर खड्डे केले. सात फूट लांबी, सात फूट रुंदी व सात फूट खोल व ते खड्डे आपण घराच्या छतावरील पाणी घराच्या बाजूला मुरवतानाची पद्धत वापरतो त्याच पद्धतीने ते वाया जाणारे पाणी त्यांनी मुरवण्याचा निर्णय घेतला .सर्व सत्तर खड्डे हे एकमेकांना जोडले जातील अशा पद्धतीची रचना केली. एक खड्डा पाण्याने भरला तर नंतर दुसरा भरावा आणि सगळे ७० खड्डे भरल्यानंतर अति पाऊस झाला तर पाणी वाया गेले तरी हरकत नाही पण अगोदर खड्डय़ात पाणी जायला हवे याची काळजी घेतली. मे महिन्यात रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या विहिरी व िवधन विहिरीतील पाणी पातळीचीही नोंद घेण्यात आली आहे. हा प्रयोग झाल्यानंतर पावसाळा संपल्यानंतर पुन्हा आजूबाजूच्या िवधन विहिरीच्या पाणी पातळीत किती वाढ झाली? त्यांची मोटर किती तास चालू लागली आहे याचेही सर्वेक्षण केले जाणार आहे . आत्तापर्यंत घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयोग झाला. देशातच नव्हे तर जगात पहिल्यांदा रस्त्यावरील पाणी मुरवण्याचा शास्त्रशुद्ध प्रयोग लातूरमध्ये करण्यात आला आहे. डॉक्टर सलीम शेख यांनी केलेल्या या प्रयोगाची दखल राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली व त्यांनी हा लातूरचा पॅटर्न देशभर जायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉक्टर सलीम शेख यांनी आपण केलेल्या संशोधनाचा प्रयोग आपण नोकरी करीत असतानाच करण्याची संधी मिळाली. गंगापूर ते पेठ या मार्गावरील या प्रयोगासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी लागणारा २९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांचे त्यांनी आभार मानले .रस्त्यावरील पाणी जर आजूबाजूला मुरवले तर रस्ते खराब होणार नाहीत व दरवर्षी रस्ते दुरुस्तीवर होणारा खर्चही वाचेल. मराठवाडय़ासारख्या भागात प्राधान्याने हा उपक्रम आगामी काळात राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एकाच उपक्रमात पाणीपातळी पण वाढेल व रस्त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही वाचेल.