औरंगाबाद महानगरपालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून आज शुक्रवारी सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला होता. भाजपाच्या काही नगरसेवकांनी एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले आहेत. एमआयएम नगरसेवक समर्थकांनी औरंगाबाद महानगरपालिका परिसरात दगडफेक केली. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप आमदार अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर औताडे, प्रमोद राठोड यांनी पोलीस आयुक्त प्रसाद यांची भेट घेतली. हे सर्व जाताना भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या वाहनावर २० ते २५ जणांच्या टोळक्याने काठी, दगडाने हल्ला केला.

वाचा : औरंगाबाद: वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकाला बेदम मारहाण

सर्वसाधारण सभेत सय्यद मतीन यांना भाजपाच्या नगरसेवकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर लगेच समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले. तसेच भाजपा कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव महापालिकेत जमा झाला होता. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. या वेळी भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडी सर्वात मागे होती या गाडीवर मतीन समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. गाडी चालक विलास काशिनाथ कोराळे यांना फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी या सर्व घटनेमध्ये हस्तक्षेप करीत  कोराळे यांची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे महापालिकेसमोर तणावाचे वातावरण असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यावरून भाजप नगरसेवकांनी मतीन यांना बेदम मारहाण केली होती.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही त्याला विरोध केला. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लाखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी एमआयएम नगरसेवक सय्यद मती यांनी केली आहे.