पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) परीक्षेतील गैरप्रकार रविवारी उघडकीस आणला. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. परिणामी, म्हाडाने सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही परीक्षा रद्द केली. परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या मंत्र्याने तीन दिवस मेहनत घेऊन, सगळ्या बातम्या गोपनीय ठेवत आरोपींना पकडून दिलं. राज्यातील पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. पेपर फुटायच्या आधी सतर्कता बाळगत परीक्षा रद्द केली. परीक्षेत किंवा पेपर फोडण्यासाठी पैशाचा वापर होणार नाही, याची दक्षता घेतली, त्या मंत्र्याच्या घरावर मोर्चा कशासाठी,” असा सवाल मंत्री आव्हाड यांनी केला आहे. एबीव्हीपीचे पेपर फोडणाऱ्यांशी लागेबांधे आहेत का की परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांचे होते, असंही आव्हाडांनी विचारलं. “परीक्षा रद्द केल्याबद्दल संबंधित विभागाचा मंत्री म्हणून मी विद्यार्थ्यांची मागितली आहे. तसेच परीक्षेची संपूर्ण फी परत करण्याची घोषणाही करत पुढची परीक्षा विनाशुल्क घेण्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे कारण नसताना असल्या राजकारणाचं कुणी बळी पडू नये,” असं आवाहन आव्हाडांनी केलं. परीक्षा झाल्यानंतर पेपर फुटलाय हे कळलं असतं तर मला तोंड दाखवायला जागा उरली नसती, असं आव्हाड म्हणाले. हेही वाचा - म्हाडा पेपरफुटी प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांचे जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात