बाहेरच्या पक्षातून उमेदवार आयात करणाऱ्या भाजपावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी हल्लाबोल केला. भाजपाला दुसऱ्यांची मुले कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. त्रिपुरातही भाजपाचा विजय हा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेतल्याने झाला. पण संघाच्या ४० वर्षांच्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाल्याचा खोटा दावा भाजपाकडून केला जातो, अशी टीका त्यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. भाजपावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, भाजपावाले रोज खिडकीत बसतात आणि तू येतो का, असं दुसऱ्या पक्षातील लोकांना विचारत बसतात. त्यांना दुसऱ्यांच्या मुलांना कडेवर घेऊन फिरण्याची हौस आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपाची खिल्ली उडवली.

मोदी टुर्स अँड ट्रॅव्हल्सने परदेशवारी केल्या. पण परदेशातून एकही रुपया देशात यायला तयार नाही. आता निवडणुका जिंकणे कठीण दिसत असल्याने भाजपाकडून राम मंदिराचा विषय पुढे रेटला जात आहे. दंगली घडवून सत्तेत येण्याचा त्यांचा डाव आहे, या दंगलीमुळेच विप्रोचा प्रकल्प गेला, असा आरोप त्यांनी केला..

भाजपा नुसतं खोटं बोलणार पक्ष आहे. पैसा आणि ईव्हीएमच्या जिवावरच हा पक्ष निवडून येत आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन बंद करुन पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे. मग भाजपाला त्यांचा जागा कळेल, असे त्यांनी म्हटले आहे.