आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असून यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत भविष्यातील वाघांच्या अस्तित्त्वावर चिंता व्यक्त केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी वाघासारखा डौलदार प्राणी, पुढच्या पिढयांना फक्त पुस्तकात आणि जुन्या चित्रफितीत बघायला लागेल अशी भीतीही व्यक्त केली आहे. दिल्लीत सकाळी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अखिल भारतीय व्याघ्र गणना २०१८चा अहवाल सादर करण्यात आला. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे पण तोच प्राणी आज अस्तित्वसाठी झुंज देतोय. ह्याला कारण म्हणजे वाघांची होणारी बेबंद शिकार आणि मानवी वस्तीत वाघ आणि मानव ह्यांच्यात होणारा संघर्ष. वाघासारखा प्राणी खरंतर मानवी वस्तीपासून जास्तीत जास्त दूर रहायचा प्रयत्न करतो, पण आपणच त्याच्या वस्तीवर आक्रमण करतो. हे थांबायला हवं". पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "वाघांची गणना व्हायलाच हवी पण फक्त तेवढ्यावर न थांबता जंगलांवर मानवाचं होणारं अधिक्रमण कठोरपणे थांबवायला हवं. नाही तर वाघासारखा डौलदार प्राणी, पुढच्या पिढयांना फक्त पुस्तकात आणि जुन्या चित्रफितीत बघायला लागेल". दरवर्षी २९ जुलै हा 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' म्हणून साजरा केला जातो. २०१० पासून हा दिवस साजरा करण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रशियातील पीटर्सबर्ग शहरात पार पडलेल्या एका संमेलनात वाघांची संख्या २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तेव्हापासूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस म्हणून साजरा केला जातो. "एक था टायगर” ते "टायगर जिंदा है” हा व्याघ्रसंवर्धनाचा प्रवास सुखकारक - मोदी २०१४मध्ये भारतात वाघांसाठी संरक्षित प्रकल्पांची संख्या ६९२ इतकी होती. ती २०१९ मध्ये ८६० पेक्षा अधिक झाली आहे. त्याचबरोबर कम्युनिटी रिझर्व्हची संख्याही २०१४ मध्ये असलेल्या ४३ वरुन शंभराहून अधिक झाली आहे. त्यामुळे मी या क्षेत्राशी जोडल्या गेलेल्या लोकांना हेच सांगेन की ‘एक था टायगर’ पासून सुरु झालेला हा प्रवास आता ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. मात्र, हा प्रवास थांबता कामा नये. व्याघ्र संवर्धनाशी जोडलेले जे प्रयत्न आहेत त्यांचा अधिक विस्तार व्हायला हवा तसेच त्यांचा वेग अधिक वाढायला हवा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे