छगन भुजबळ आणि प्रफुल पटेल यांनी दावा केला होता की, शरद पवार एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, यांचे सर्वांचे (अजित पवार गट) प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते. पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला.

कोण असली, कोण नकली, हे जनता ठरवेल

भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथे लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर टीका केली होती. राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते. यावरही जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातल्या एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडा-फोड केली त्यांनीच त्यात कोण असली आणि कोण नकली ठरवणं योग्य नाही. खरंतर कोण असली, कोण नकली, हे महाराष्ट्रातील जनतेला हे ठरवू दिलं पाहीजे. जनतेने हा निकाल घेतला आहे, तो मतपेटीतून दिसेल”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”

नांदेड येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, “आमच्यासमोर जे निवडणूक लढत आहेत ते राहुल गांधींच्या नेतृत्वात लढत आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष आमच्या विरोधात आहेत. एक आहे नकली शिवसेना, दुसरी आहे नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धी उरलेली काँग्रेस पार्टी. गुजरातमध्ये म्हण आहे, ‘तीन तिघडा काम बिघडा’. उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष अर्धा राहिला, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष अर्धा झाला. या दोघांनी काँग्रेसलाही अर्धे करुन टाकलं. हे अर्धवट पक्ष महाराष्ट्राचं भलं करु शकत नाही.”

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित

बारामतीमध्ये अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यासाठी आक्रमक प्रचार सुरू केला असून सुनेत्रा पवार यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, बारामतीमध्ये कुणी काहीही सांगत असले तरी तिथे सुप्रिया सुळेच मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.