केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या अजातशत्रू स्वभावासाठी ओळखले जातात. सर्वच पक्षांमध्ये गडकरींचा मित्रपरिवार असल्याचं अनेक प्रसंगी दिसून येतं. यातूनच गडकरींचे राजकीय किस्से चर्चेत असतात. मुंबईच्या 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन हायवे' या परिषदेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र मंत्रिपदाच्या कारकिर्दीत घडलेले काही किस्से सांगितले. यावेळी धिरुभाई अंबानींचं टेंडर आपण नाकारलं, तेव्हा नेमकं काय झालं होतं, हे गडकरींनी सांगितलं. गडकरींनी सांगितली १९९५मधली 'ती' आठवण! नितीन गडकरींनी यावेळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या बांधाकामापूर्वीची म्हणजेच १९९५ साली ते महाराष्ट्रात मंत्री असतानाची आठवण सांगितली. "आजच्या परिषदेमुळे मला महाराष्ट्रातील १९९५ सालचा माझा मंत्रिपदाचा कार्यकाळ आठवला. तेव्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे च्या बांधकामासाठी धिरूभाई अंबानींनी रिलायन्सकडून टेंडर दाखल केलं होतं. पण मी ते रिजेक्ट केलं होतं. त्यामुळे धिरूभाई माझ्यावर नाराज झाले होते. माझे मुख्यमंत्री देखील नाराज झाले. खुद्द बाळासाहेब ठाकरे देखील माझ्या या निर्णयामुळे नाराज झाले होते", असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. "…तेव्हा सर्वजण माझ्यावर हसत होते!" दरम्यान, आपल्या या निर्णयाविषयी बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला विचारणा केल्याचं नितीन गडकरी म्हणाले. "माझ्या निर्णयानंतर बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले, तुम्ही असं का केलं. मी त्यांना सांगितलं आपण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, वांद्रे-वरळी सी लिंक आणि अशा इतर प्रकल्पांसाठी लोकांकडून पैसा उभा करू. तेव्हा सर्वजण माझ्यावर हसत होते", असं गडकरी म्हणाले. भारतात प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ का लागतो?; नितीन गडकरींनी सांगितली कारणे "हा प्रसंग माझ्या लक्षात राहिला कारण.." दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कामाची मोकळीक दिल्याचं गडकरी म्हणाले. "मनोहर जोशींनी मला सांगितलं की तुम्ही जे करताय ते करा. आम्ही मग एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना केली. तेव्हा मी त्याचा सहसंचालक होतो. आम्ही गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्यासाठी लॅपटॉप वगैरे घेऊन चेंबर ऑफ कॉमर्ससमोर प्रेझेंटेशन करण्यासाठी गेलो होतो. मला हा प्रसंग आठवतोय कारण तेव्हा आम्ही गुंतवणूकदारांकडे गेलो होतो, आता गुंतवणूकदार आमच्याकडे येतात", अशी आठवण यावेळी गडकरींनी सांगितली. रिलायन्सची ३६०० कोटींची निविदा, प्रकल्प १६०० कोटींमध्ये पूर्ण! रिलायन्सनं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसाठी ३६०० कोटींची निविदा सादर केली होती. आम्ही ती फेटाळली आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून तो प्रकल्प अवध्या १६०० कोटींमध्ये पूर्ण केला. २ हजार कोटी रुपये आम्ही वाचवले. नंतर राज्य सरकाने तो मोनेटाईज करून त्यातून ३००० हजार कोटी मिळवले. दीड वर्षापूर्वी आम्ही तो पुन्हा मोनेटाईज केला आणि त्यातून ८ हजार कोटी मिळाले, असं देखील गडकरींनी यावेळी बोलताना सांगितलं.