“लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. करोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत, खूप संभाळून पावले उचलतात – देवेंद्र फडणवीस

“आता थोडे धाडसी निर्णय घ्यावे लागतील. राज्य सरकारने तज्ज्ञांची समिती तयार केली होती. त्यांचे अहवाल आले आहेत. त्यात ज्या शिफारशी केल्या आहेत, त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे” असे फडणवीस म्हणाले. “उद्या चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांच पहिलं प्राधान्य महाराष्ट्राला असणार आहे. कारण महाराष्ट्र उद्योगात आघाडीवर आहे. करोनाचा काळ युद्धाची, आंदोलनाची तयारी करतो तसा आहे. करोनानंतरच्या काळत सर्व क्षेत्राचा विकास कसा करायचा, त्याचं प्लानिग करुन ठेवावं लागेल. महाराष्ट्राला कधीही निधीची कमतरता पडू शकत नाही” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- मुंबईत करोनाचं प्रमाण नियंत्रणात आलं तर मृत्यूदर अधिक का?; फडणवीसांचा सवाल

“धाडसी निर्णय घेतले पाहिजेत पण सरकारचा तशी तयारी दिसत नाही असेही ते म्हणाले. मुंबईत दिवसाला पाच ते साडेपाच हजार चाचण्या होत आहेत. चाचण्यांचे हे प्रमाण पुरेसे नाही. सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असलेले निर्णयही घेतलेले नाहीत” अशी टीका त्यांनी केली.

आणखी वाचा- आपल्याकडे लॉकडाउन, अनलॉकचा ताळमेळच नाही : राज ठाकरे

“करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीत राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. दिल्लीत २८ हजारच्या आसपास चाचण्या सुरु आहेत. तिथे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आली. महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग कमी आहे. त्यामुळे आयसोलेशन सेंटर रिकामी आहेत. जास्तीत जास्त चाचण्या आणि आयसोलेशनच्या माध्यमातूनच करोनाच्या साथीवर नियंत्रण मिळवता येईल” असे फडणवीस यांनी सांगितले.